कोकणातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा पराभव सहन करावा लागला.
रत्नागिरीत 151 पैकी केवळ 17 आणि सिंधुदुर्गात 77 पैकी फक्त 8 नगरसेवक निवडून आले.
निकालानंतर अवघ्या 24 तासांतच दोन्ही जिल्ह्यांतून महत्वाच्या नेत्यांचे राजीनामे समोर येऊ लागले आहेत.
Kokan Politics : कोकणात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप आणि शिवसेनेच्या वादळासमोर पालापाचोळा झाला. रत्नागिरीत १५१ नगरसेवकांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेचे १७ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७७ पैकी फक्त ८ नगरसेवक निवडणूक आले आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांचे अनामत रक्कमही जप्त झाली आहे. यावरून आता दोन्ही जिल्ह्यात कमालीची नाराजी पसरली असून राजीनामे पडण्यास सुरूवात झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात ठाकरेंच्या महत्वाच्या नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. यामुळे निकालाचे 24 तास होण्याच्या आतच ठाकरेंच्या शिवसेनेत राजीनाम्याचे वादळ आल्याचे दिसत आहे.
किनारपट्टीवर कधीकाळी असलेला ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव विधानसभेनंतर कमी झाला होता. तर आता नुकताच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पार संपल्यात दिसत आहे. याचे परिणाम आता ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून शिवबंधन तोडले जात आहेत. चिपळूण पालिकेची निवडणूकीत पराभव झाल्याने युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करताना स्थानिक पातळीवर पक्षाची सुरू असलेली कार्यपद्धती अत्यंत घातक आणि क्लेशदायक असल्याचे खडे आणि कडू बोल सुनावले आहेत. तर कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे, ही पद्धत कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारी असल्याची भावना व्यक्त टाकळे यांनी आहेत.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेमध्ये सरळसरळ उभे दोन गट पडले. एक गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी झाला तर दुसऱ्या गटाने विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणूक लढवली. पक्षाची ताकद विभागली गेल्याने निवडणुकीत पानिपत झाले. आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे पक्षाची किमान लाज तरी राखली गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली ५ नगरसेवक निवडून आले. राऊत गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाल्याचे म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
त्यांनी आपला झालेला पराभव स्वीकारत, लगेच आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे. मात्र राजीनामा देताना त्यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे. चिपळूणमधील टाकळे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर शिवसैनिक आहेत. आम्हाला स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पक्षाचे अहोरात्र काम केले. पण पक्षातील अंतर्गत वादामुळे आमच्यासह पक्षाची वाताहत झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
चिपळुणात सध्या पक्षाची कार्यपद्धती ज्या पद्धतीने सुरू आहे ते अत्यंत घातक तसेच क्लेशदायक आहे. नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आणि कार्यकर्त्यांची वेळ आली की, कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे ही पद्धत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहे. मी एक उच्चशिक्षित युवती पदाधिकारी म्हणून मला ते न पटणारे आहे. म्हणूनच मला टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे.
माझे वडील समीर टाकळे यांनी देखील पक्षासाठी आपले उभे आयुष्य वेचले. स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दिवसरात्र काम केले; परंतु त्यांचे राजकीय आयुष्यदेखील बरबाद झाले. नेहमी जर असेच होणार असेल तर मग पक्षात राहून काम तरी कशाला करायचे? त्यापेक्षा वेळीच बाजूला झालेले योग्य आहे. त्यामुळेच मी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे, असे डॉ. टाकळे यांनी स्पष्ट केले आहे.
यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सावंतवाडी शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे दिला आहे. तोरस्कर यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे, की ‘नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाने नगराध्यक्षांसह २१ उमेदवारांचे पॅनेल उभे केले होते.
मात्र, केवळ एका जागेवर पक्षाला यश मिळाले, तर स्वतः तोरसकर यांच्यासह इतर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. अनेक उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. या पार्श्वभूमीवर तोरसकर यांनी जिल्हाप्रमुखांना पत्र पाठवून राजीनामा सुपूर्द केला. पक्षासाठी गेले वर्षभर मेहनत घेऊनही निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवासाठी कोणालाही जबाबदार न धरता शहर संघटक म्हणून स्वतः ही जबाबदारी स्वीकारत असून नैतिकतेच्या नात्याने पदाचा राजीनामा देत आहे.’
1. ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात किती नुकसान झाले?
रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून फक्त 25 नगरसेवक निवडून आले.
2. सर्वाधिक फटका कुठल्या जिल्ह्यात बसला?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत मोठा पराभव झाला.
3. राजीनाम्यांची सुरुवात कधी झाली?
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 24 तासांच्या आत राजीनामे सुरू झाले.
4. अनामत रक्कम जप्त होण्याचा अर्थ काय?
अनेक उमेदवारांना ठराविक मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
5. या पराभवाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल व नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.