Sindhudurg News : राज्यात गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाल्या. याला काहीच महिनी झाले आहेत. राज्यात महायुती आली असून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. पण या धक्क्यातून राष्ट्रीय काँग्रेस अद्याप सावरलेली नसून विधानसभा निवडणुकीचा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. याबाबत शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. तर हे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना दिले आहे.
देशातील निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु, नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार दिसून आले आहेत. मतदारयाद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत मोठा गोंधळ व घोटाळा झाल्याच्या तक्रारी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी सुद्धा केलेल्या आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर मतदानाच्या टक्केवारीतही मोठी तफावत दिसून आलेली आहे.
निवडणूक आयोगाकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात सविस्तर आकडेवारी व पुराव्यासह तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करताना काही महत्वाची कागदपत्रे जसे की मतदार याद्या, मतदानाचे सीसीटिव्ही फुटेज मागितले होते. पण, निवडणूक आयोगाने ते अद्याप दिलेले नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या 5 वर्षात महाराष्ट्रात 31 लाख मतदारांची संख्या वाढली होती. परंतु, 2024 लोकसभा निवडणूक ते नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार झाल्याचे दिसत आहे.
अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत तब्बल 41 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले, हे आश्चर्यकारक आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत प्राथमिक मतदानाची आकडेवारी 60 टक्के होती, ती अंतिम 59.5 टक्के झाली. तर ती 2014 ला प्राथमिक मतदान 62 टक्के तर अंतिम 63 टक्के झाल्याचे जाहीर केले. 2019 ला प्राथमिक टक्केवारी 60.46 टक्के होती. तर अंतिम टक्केवारी 61.10 टक्के होती. परंतु, 2024 च्या निवडणुकीत मात्र मतदानाची प्राथमिक टक्केवारी 58.22 टक्के असताना अंतिम टक्केवारी मात्र 66.5 टक्के जाहीर करण्यात आली. जी तब्बल 8 टक्क्यांनी वाढली आहे.
आधीच्या चार-पाच निवडणुकीतील मतदानात 1 टक्क्यांचीही तफावत नसताना 2024च्या निवडणुकीत 8 टक्क्यांपर्यंत मोठी तफावत कशी? वास्तविक पाहता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व यंत्रणा अद्यावत झालेल्या असताना अशा पद्धतीने घोळ कसा काय झाला? यावरील निवडणूक आयोगाचे उत्तर तर्कसंगत नाही. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेख यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली. तसेच काँग्रेसनेही सातत्याने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात पाठपुरावा केलेला आहे. परंतु, निवडणूक आयोग आमच्या तक्रारीचे समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. निवडणूक प्रक्रीया ही लोकशाही व्यवस्थेत अत्यंत महत्वाची असते, असे असताना राजकीय पक्ष व जनतेचा जर या प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला तर निवडणुका या केवळ फार्स ठरतील आणि लोकशाही व्यवस्थेसाठी ते अत्यंत घातक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.