सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली नगरपरिषद निवडणुकांत निलेश राणेंनी नितेश राणेंवर विजय मिळवला.
‘राणे विरुद्ध राणे’ लढत संपल्याचे बोलले जात असतानाच नितेश राणेंच्या ट्वीटने पुन्हा राजकीय वातावरण तापले.
इशारा स्वरूपाच्या ट्वीटमुळे सोमवारी सकाळीच सिंधुदुर्गातील राजकारणात खळबळ उडाली.
Sindhudurg News :नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निकालाता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. येथील मालवण आणि कणकवलीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाऊ नितेश राणे यांच्यावर विजय मिळवला आहे. तर सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या निकालानंतर मालवण–कणकवलीत रंगलेला 'राणे विरुद्ध राणे' लढतीचा शेवट देखील झाल्याचे बोलले जात होते. मात्र सोमवारी (ता.22) सकाळीच मंत्री नितेश राणे यांनी ट्वीटवर इशारा बाँम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण तापले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणातील वाद शांत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. निकालानंतर निलेश राणेंनी प्रतिक्रिया देताना एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू म्हणत भावाच्या पराभवावर खंत व्यक्त केली होती. तर आपण एकच परिवार असल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ नितेश राणेंनीही भावाच्या नेतृत्वाचा विजय असल्याचे म्हणत ‘राजकारणापलीकडे जाऊन विकासकामांसाठी सहकार्य करू’ अशी ग्वाही दिली होती. यामुळे दोघा भावांतील राजकीय संघर्षाला आता पूर्णविराम लागल्याची चर्चा सुरू झाली होती.
याच दरम्यान आता नितेश राणे यांनी सकाळी सकाळी केलेल्या एका सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांतच त्यांनी घेतलेल्या या ‘आक्रमक’ पवित्र्यामुळे पडद्यामागे नक्की काय घडतयं, असा प्रश्न आता जिल्ह्यातील जनतेसह राजकीय वर्तुळात पडला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये, "गप्प होतो... पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी... पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे!", असे म्हटलं आहे. त्यांचा हा इशारा नेमका कोणाला आहे असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
नितेश राणे यांच्या या ट्वीटप्रमाणे पक्ष म्हणजे भाजप, माझ्या नेत्याच्या म्हणजे नारायण राणे आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी म्हणजे निलेश राणेंशी निगडीत असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीच्या आधी येथे घडलेल्या घडामोडी, युतीसाठी सतत निलेश राणेंनी घेतलेला स्टँड, पण भाजपची भूमिका, त्यानंतर पैसै वाटपावरून झालेल्या गदारोळ आणि निलेश राणेंवर दाखल झालेला गुन्हा, तसेच निलेश राणेंनीच वडिलांचे राजकारण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा केला होता. यातूनच दोन्ही भावात राजकीय संघर्षासह दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळेच ही निवडणूक राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती.
यानंतर आता निवडणुकीचा निकाल लागला असून कणकवली नगर परिषद निवडणुकीत नितेश राणे यांना मोठा धक्का बसला असून संदेश पारकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. मालवणमध्ये देखील निलेश राणेंनी थेट शहर विकास आघाडीला पाठिंबा देत प्रचारात भाग घेतल्याने येथेही भाऊ नितेश राणेंना धक्का बसला आहे. यानंतरच त्यांनी, ट्वीट करत निवडणुकीच्या धामधुमीत बाळगलेले मौन सोडण्याचा इशारा दिला आहे. तर आता पत्रकार परिषदेत ते कोणाचे ‘वाभाडे’ काढणार, याकडे केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर ते कोणाचे नाव घेवून टीका याकडेही लक्ष लागले आहे.
1. सिंधुदुर्गमध्ये कोणत्या नगरपरिषदांच्या निवडणुका चर्चेत होत्या?
मालवण आणि कणकवली नगरपरिषदांच्या निवडणुका विशेष चर्चेत होत्या.
2. निवडणुकीत कोणाचा विजय झाला?
निलेश राणेंनी या निवडणुकीत विजय मिळवला.
3. ‘राणे विरुद्ध राणे’ लढत म्हणजे काय?
निलेश राणे आणि नितेश राणे या बंधूंमधील राजकीय संघर्षाला ही संज्ञा वापरली जात होती.
4. नितेश राणेंच्या ट्वीटमुळे काय घडलं?
इशारा देणाऱ्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आणि चर्चांना उधाण आले.
5. या घटनेचा राजकीय अर्थ काय मानला जात आहे?
निकालानंतरही संघर्ष कायम असल्याचे संकेत मिळत असून सिंधुदुर्गातील राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.