Nitesh Rane Sarkarnama
कोकण

sindhudurg politics : राणे विरूद्ध चव्हाण वाद? नितेश राणेंच्या संतापाचा कडेलोट; विरोधकांना इशारा देत म्हणाले, 'काड्या' लावून आपली...

rane-chavan controversy : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे विरूद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असा वाद रंगला होता. निवडणुकीच्या काळात सुरू झालेल्या या वादावर आता पडदा पडला असून यावर आता भाजप नेते तथा मंत्री नितेश राणेंनी मिश्किल भाष्य करताना विरोधकांना इशारा दिला आहे.

Aslam Shanedivan

  1. नगर निवडणुकीदरम्यान पैशांच्या वाटपावरून राणे आणि भाजप नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता.

  2. निकालानंतर वाद शांत झाला असला तरी वितुष्टाची चर्चा अजूनही सुरू आहे.

  3. मंत्री नितेश राणे यांनी काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचा इशारा दिला.

BJP ravindra chavan controversy : काहीच महिन्यापूर्वी झालेल्या नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटपावरून तळकोकणात महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी तर पैसे पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच आरोप केले होते. यामुळे निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे हे दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर ठाठले होते.

दरम्यान निकालानंतर या वादावर पडदा पडला. मात्र राणे कुटुंब आणि चव्हाण यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा अद्याप आहे. यावरच भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी असे वितुष्ट निर्माण करण्याचे उद्योग काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहेत. त्यांनी आता वेळीच सावध व्हावे, असा इशारा देत मिश्किल भाष्य केले आहे. यावरूनही आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ते आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

निवडणूक कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंब आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. चव्हाण यांनी तर निकालानंतर युतीच संपवू असे भाष्य करत निलेश राणेंवर तोफ डागली होती. यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती दिसणार की नाही असा पेच निर्माण झाला होता. पण हिवाळी अधिवेशनात नागपुरमध्ये या वादावर पडदा टाकण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आमदार नीलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेत विषय संपल्याचे जाहीर केले होते.

यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंब विरूद्ध रवींद्र चव्हाण असा सुप्त वाद सुरूच असल्याची कुजबूज होती. तर नुकताच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्षांना मिळालेल्या रसदमध्येही रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचे बोलले जात होते. यावरून वाद सुरू झाल्यानंतर मंत्री नीतेश राणे यांनी असे हात उखडून टाकू असा इशारा दिला होता. ज्यामुळे राणे विरूद्ध रवींद्र चव्हाण वाद आणखीनच चिघळल्याचे बोलले गेले.

मात्र आता या सर्वावर नितेश राणे यांनी मिश्किल भाष्य करत थेट विरोधकांनाच इशारा दिला आहे. त्यांनी, राणे कुटुंब आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक काही लोकांकडून सुरू आहे. अशा प्रकारे 'काड्या' लावून ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. पण आता आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा नितेश राणे यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच विरोधकांचा खरपूस समाचार घेत राणे कुटुंबाच्या एकजुटीचा पुनरुच्चार केला आहे.

या सोहळ्यात बोलताना नितेश राणे यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कौतुक असून ते अतिशय स्वच्छ मनाचे गृहस्थ आहेत. मात्र, काही लोक सातत्याने आमच्या कुटुंबामध्ये आणि चव्हाण यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात अशा 'कॉमन' लोकांचा वावर वाढला. जे जिल्ह्याच्या विकासासाठी घातक आहे. पण आता अशी दरी निर्माण करणाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न थांबले पाहिजेत.

तसेच यावेळी कणकवली नगरपरिषदेच्या पराभवावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपला पराभव झाला याचे दुःख होतेच. पण तो नीलेश राणेंच्या समोर झाला. यामुळे त्या पराभवाचे काहीच वाटत नाही. शेवटी राणेंच्या समोर राणेच जिंकले आहेत. सिंधुदुर्गची जनता आणि खासदार नारायण राणे यांचे नाते अतूट असून ते अधिक घट्ट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. हा वाद कशामुळे सुरू झाला?
नगर निवडणुकीदरम्यान पैशांच्या वाटपाच्या आरोपांमुळे वाद सुरू झाला.

2. कोणत्या नेत्यांमध्ये हा वाद आहे?
निलेश राणे, नितेश राणे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात हा वाद चर्चेत आहे.

3. नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली?
काही लोक जाणीवपूर्वक वितुष्ट निर्माण करत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

4. वाद अजूनही सुरू आहे का?
अधिकृतपणे वाद शांत असला तरी राजकीय चर्चांमध्ये तो अजूनही जिवंत आहे.

5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
यामुळे युतीतील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT