Bharat Gogawale, Uddhav Thackeray
Bharat Gogawale, Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : गोगावल्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा हल्लाबोल; भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडणारच

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray in Mahad : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाड येथे शनिवारी (ता. ६) शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यासह काँग्रेस भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले. स्नेहल जगताप यांनी यापुढील महाडचा आमदार आपल्याच पक्षाचा असणार, असा शब्दही ठाकरेंना दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. शिवसेनेत फूट पाडून भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना दिला आहे.

यावेळी ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, मला नॅपकीनवाल्यांची भीती वाट नाही. राज्यात व देशात पुन्हा हुकूमशाही वृत्तीचे सरकार येणार कसे येणार नाही, याची चिंता लागली आहे. स्नेहल जगताप आणि कुटुंबाने काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्याने काहींच्या भुवया उंचवल्या आहेत. तर काहींच्या पोटात गोळा आला आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही."

तळये गावातील पुनर्वसनावरूनही ठाकरेंनी शिंदे सरकार आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे म्हणाले, "धरण फुटल्याने परिसरातील गावातील नागरिक उघड्यावर आली होती. मुख्यमंत्री असताना मी तळ्ये गावाच्या पुनर्वसनाचे आदेश दिले होते. मात्र अद्याप तेथील १५ लोकांनाच घरे मिळाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आयोध्या, कर्नाटकमध्ये फिरत आहेत. मात्र मुख्यमंत्री झाल्यापासून ते तळ्ये गावात आलेले नाहीत. येथील आमदारही खांद्यावर नॅपकिन टाकून तळयेमध्ये जात-येत असेल, मात्र कामाबाबत पाठपुरावा केला जात नाही. आता या नॅपकिनवाल्यांना घाम फोडायचा आहे."

भाजप (BJP) सरकार फक्त आश्वासने देते, त्यानंतर दंगली घडवून भावनांचे राजकारण करते, असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले, "निवडणुका आल्या की घोषणांचा पाऊस पडतो. जुमल्यांना फसून लोक आपले सोन्यासारखे मत देतात. पुढे दिलेली आश्वासने विसरण्यासाठी समजात तेढ निर्माण केला जातो. दंगली घडविल्या जातात. भाजप महागाई, बेराजगारीवर न बोलता फक्त हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरते. तेच कर्नाटकमध्ये होत आहे. सध्या देशात दडपशाही सुरू आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे जात आहे. आता २०२४ मध्ये भाजप निवडून आले तर ही शेवटची निवडणूक ठरेल. लोकशाही टिकविण्यासाठी 'अब की बार भाजप तडीपार' करावे लागणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT