Bharat Gogawale  Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale News : ...अखेर गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्नं पूर्ण होणार ? शिंदे गटातील नेत्याने दिले मोठे संकेत

Deepak Kulkarni

Mumbai News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले हे मंत्रिपद आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड इच्छुक आहेत. ज्या-ज्या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा झडू लागतात, तेव्हा गोगावलेंचे नाव हमखास चर्चेत असते, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यांच्या नेत्यांना मंत्रिपदासह पालकमंत्रिपदाचीही जबाबदारीही मिळाली.

मात्र, गोगावलेंना मंत्रिपदासह पालकमंत्रिपदाने अद्याप हुलकावणीच दिली आहे. यावरून त्यांनी अनेकदा उघड उघड नाराजीही बोलून दाखवली आहे, पण आता गोगावले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मंत्री होणार असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्याने केला आहे. त्यामुळे गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्नं पूर्ण होणार का, या चर्चेला उधाण आले आहे.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्राेत्सवात होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदे गटालाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी शिंदे गटाचे आमदार व नेते महेंद्र थोरवे यांनी मोठे विधान केले आहे. थोरवे म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, असं ते म्हणाले आहेत.

थोरवे म्हणाले, रायगडचे पालकमंत्री आणि रायगडचे मंत्री हे भरत गोगावलेच होणार आहेत. आमच्या सर्व आमदारांचा त्यांनाच पाठिंबा आहे. सध्या ते चर्चेत नाहीत. त्याचमुळे गोगावले यांच्या गळ्यामध्ये मंत्रिमंडळाची माळ पडणार असल्याचा दावा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा विश्वास सर्व शिवसेना आमदारांना आहे, असेही थोरवेंनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरें(Sunil Tatkare) मध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली होती, पण काही दिवसांपूर्वी आमदार भरत गोगावले, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. ही बैठक रायगडच्या पालकमंत्रिपदावर तोडगा काढण्यासाठी होत असल्याची शक्यता बोलली जात आहे.

गोगावलेंसोबतच्या बैठकीनंतर तटकरे काय म्हणाले होते...?

खासदार सुनील तटकरे म्हणाले, रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि भाजपचे तीन आमदार आहेत. असे असताना राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना समन्वय समितीमध्ये मी असल्यामुळे याबाबतीत आमच्यामध्ये आज चर्चा झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून घेतील, हा पूर्णपणे अधिकार त्यांना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

" मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री..."

याचवेळी महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर आमची ही पहिलीच भेट आहे. आगामी काळातील ग्रामपंचायत निवडणुका आम्ही महायुती म्हणून रायगड जिल्ह्यात लढणार असल्याचे आमदार भरत गोगावले म्हणाले होते. तसेच मी अजून मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री कसा होईल, असा सवालही उपस्थित केला होता. मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री होता येईल. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रिपद राखून ठेवलेलं आहे. विचारविनिमय सुरू आहेत. त्यातून योग्य ते घडेल, असेही ते म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT