सरकारनामा
कोकण

भाजपला मोठा धक्का ; ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक राष्ट्रवादीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उल्हासनगरमध्ये (ulhasnagar) आलेल्या राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी राजकीय घडामोड झाली आहे. मध्यरात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या नेत्यांमध्ये बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये आले होते.

ओमी कलानी (omi kalani) गटाच्या २२ नगरसेवकांनी आज ठाण्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत हे २२ नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

ज्योती कलानी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात सध्या कुणीही नव्हते. मात्र आता उल्हासनगर पालिकेतील कलानी गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

उल्हासनगरच्या राजकारणात कलानी या नावाला मोठं वलय आहे. कारण आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानी यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९० पासून सलग ४ वेळा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. यापैकी काँग्रेस, आरपीआय, तर दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. २०१४ मध्ये त्यांच्या पत्नी ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. या दरम्यानच्या काळात पप्पू कलानी यांना एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे ते १५ वर्ष तुरुंगात होते. आता पप्पू कलानी हे सध्या बाहेर आले आहेत. त्यांनी शहरात लोकांच्या गाठीभेटी, कार्यक्रमांना देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. रात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत हे नेते 'कलानी महल'मध्ये होते. त्यामुळे पप्पू कलानी हे शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उल्हासनगरमध्ये उधाण आले आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे एकूण ४० नगरसेवक असून त्यापैकी ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी मधील प्रवेशानंतर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई देखील होणार नसून भाजपला या नगरसेवकांना व्हिप देखील जारी करता येणार नसल्याचे समजते. आता पप्पू कलानी हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले, तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला एकहाती सत्ता काबीज करणे सोपे होवू शकते. त्यामुळे आता पप्पू कलानी हे नेमका काय निर्णय घेतात आणि शहराच्या राजकारणात काय भूकंप होतो, याकडे उल्हासनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT