Vaibhav Naik.jpg Sarkarnama
कोकण

Vaibhav Naik: ठाकरेंच्या आमदारांचं मोठं पाऊल,गुन्हा दाखल झाला तरी मागे हटला नाही; थेट नोटिसच धाडल्या

Deepak Kulkarni

Sindhurdurg News : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वीच उ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला.या दुर्घटनेनंतर राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.आता याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील जयदीप आपटे आणि डॉ.चेतन पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. त्यापैकी आपटे अद्याप फरार असून पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आता याप्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे.

आमदार वैभव नाईक यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत. नाईक यांनी नौदल विभाग,बांधकाम मंत्रालय आणि राज्याचे मुख्य सचिव यांना नोटीस धाडल्या आहेत. इतरांचे जीव धोक्यात घातल्याप्रकरणी कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नोटीसमधून करण्यात आली आहे.

या कायदेशीर नोटिशीत निविदा प्रक्रियाच बेकायदेशीरतेकडे जाणारी होती. पुतळा कोसळण्यामागील अपारदर्शक प्रक्रिया आणि भ्रष्टाचाराबद्दल गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्यामध्ये राजकीय पाठबळ व सहभाग पुतळा पडण्याच्या प्रक्रियेपर्यंत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.पुतळ्याच्या उभारणीचे आदेश भारतीय नौदल विभागाच्या वतीने ‘मेसर्स आर्टिस्ट्री’ या कंपनीला दिले गेले होते, ज्याचे मालक जयदीप आपटे आहेत.

या पुतळ्याच्या उभारणी प्रक्रियेत आवश्यक असलेले वैज्ञानिक निकष पाळले गेले नसल्याने आणि भौगोलिक परिस्थितीचा योग्य अभ्यास न केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचा महत्वाचा मुद्दा या कायदेशीर नोटिसीद्वारे ॲड.असीम सरोदे यांनी उपस्थित करण्यात आला आहे. पुतळा कोसळल्याने मानवी जीवितहानी झाली असती असेही संबंधित नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

निकृष्ट बांधकामाचा दर्जा आणि त्याद्वारे हत्या करण्याचा प्रयत्न, इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य, खुनाचा प्रयत्न आणि फसवणूक करण्यासाठी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील हे निश्चितच जबाबदार असल्याचा दावाही आमदार वैभव नाईक यांनी या नोटिशीद्वारे केला आहे.

यासोबत महाराष्ट्र सरकार (State Government), नौदल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देखील हत्या करण्याचा प्रयत्न आणि खुनाचा प्रयत्न, इतरांचे जीवन धोक्यात आणणारे कृत्य यासारख्या गुन्ह्यांसाठी दोषी असल्याने या सर्वांवर योग्य ती चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी अशी मागणी वैभव नाईक यांनी नोटिशीमधून केली आहे.कायदेशीर नोटीसला सात दिवसाच्या आत उत्तर दिले नाही तर न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा देखील नोटीसमधून देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT