Pandharpur News : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. सरकार त्यांना दाद देत नसल्याने ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना दिसत आहेत. यामुळे आता या मुद्याला आता हिंसक वळण लागण्याची शक्यता असून सोलापुरात लक्ष्मण हाके आणि मराठा युवकांची झटापट झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता या युवकांवर गुन्हा दाखल झाला असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून त्यांच्यावरून सरकारलाच थेट इशारा देण्यात आला आहे. तर हाकेंना महाराष्ट्र सरकारने दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मागणी नंतर पुन्हा मराठा - ओबीसी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्र सरकारने दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच 15 दिवसांच्या आत सुरक्षा न काढल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा डोंगरे यांनी सरकारला दिला आहे.
डोंगरे यांनी, हाके यांना 273 मते पडली असताना, कोणते मोठे समाजकार्य किंवा योगदान नसताना सरकारने वाय प्लस सुरक्षा का दिली? असा सवाल केला आहे. तसेच चार SPO पुढे-मागे पोलीस गाड्या असं संरक्षण देखील का दिलं जात आहे असा देखील सवाल उपस्थित केला आहे.
हाके हे OBC मराठा वाद लावून जाती-जातीत भांडण लावण्याचे आणि दंगल घडवण्याचे काम करतात असा आरोप डोंगरे यांनी केला आहे. त्याचबरोबर हाके यांना सरकारने दिलेली वाय प्लस सुरक्षा काढून घ्यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली असून या सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करावा, अशी विनंती केल्याचेही डोंगरे यांनी म्हटले आहे.
हाकेंच्याविरोधातील या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातील युवकांनी आणि अठरा पगड जातीतील लोकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला, SP ऑफिसला जाऊन निवेदन द्यावे आणि पोलीस संरक्षण मागावे, असे आवाहन केले आहे. तर सर्वात जास्त टॅक्स भरणारा मराठा समाज असल्याचेही डोंगरे यांनी म्हटले आहे.
डोंगरे यांनी जर 15 दिवसात हाके यांचे पोलिस प्रोटेक्शन काढले नाही तर आम्ही कोर्टात जाणार असून मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. तसे झाले नाही तर पोलीस महासंचालक कार्यालयासमोर मोठं आंदोलन करू. यामुळे सरकारने ही सुरक्षा काढावी. तसे केल्यास राज्यातले वातावरण शांत होईल, असे ही डोंगरे यांनी म्हटले आहे.