Sanjay Raut: संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणी ईडीच्या कारवाईमुळं १०१ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या अटकेवर विशेष पीएमएलए कोर्टानं शंका उपस्थित करत ही अटक बेकायदा असल्याचं सांगत त्यांना जामीन मंजूर केला होता. सध्या राऊतांचं हे प्रकरण सुरुच असलं तरी ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. पण आता त्यांनी एका ताज्या मुलाखीत आपल्याला झालेला कर्करोग आणि ऑर्थर रोड तुरुंगांचा संबंध सांगितला आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्याची सध्या चर्चा आहे.
कोल्हापुरात एका जाहीर कार्यक्रमातील मुलाखतीत बोलताना संजय राऊत म्हणाले, अनेक चांगल्या घरातील लोक, चांगलं जीवन जगलेले लोक तुरुंगात जाऊन त्या एका छोट्याशा खोलीत राहतात. त्या छोट्याशा खोलीत दहा-दहा लोक राहतात. तिथं त्यांना टॉयलेट नाही, काही नाही. आंघोळीची नीट सोय नाही. पण त्यांना जगायचं असतं तिथून कधी सुटका होईल हे देखील सांगता येत नाही. तुम्हाला तुरुंगात जेवणही मिळत नाही व्यवस्थित. मला जो कॅन्सर झाला तो तिथून सुरु झाला. मी आजारी आहे असं म्हटलं होतं, त्यानंतर मला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याचं मूळ जे आहे ते तुरुंगात आहे.
दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंबंधी सुमारे १,०३४ कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याच्या आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा) ने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL) या कंपनीला ६७२ भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी हा प्रकल्प दिला होता. कंपनीने पुनर्वसन घरे बांधण्याऐवजी फ्लोर स्पेस इंडेक्स (FSI) खासगी बिल्डरांना विकून पैसे उकळले, असा आरोप आहे. या कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे सहकारी/मित्र असल्याचे ईडीचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाली होती.
प्रवीण राऊत यांना एचडीआयएलकडून सुमारे १००-११२ कोटी रुपये मिळाले आणि त्यातील सुमारे ३ कोटींहून अधिक रक्कम संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राऊत यांनी प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच भूमिका बजावली, बैठकांना उपस्थित राहिले आणि प्रवीण राऊत यांना 'फ्रंटमन' म्हणून वापरलं, असा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
पण संजय राऊत यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे सर्वकाही राजकीय हेतूने केलेलं प्रकरण असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण ईडीनं त्यांना १ ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली आणि त्यानंतर कोर्टामार्फत त्यांची न्यायालयीन कोठडीत (ऑर्थर रोड तुरुंगात) रवानगी झाली. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' नावाचं पुस्तक लिहिलं होतं.
त्यानंतर २०२५ मध्ये दिवाळीच्या २ ते ४ दिवस आधी त्यांना पोटाच्या कर्करोगाचं निदान झालं. ऐन दिवाळीत राऊत यांनी ट्विट करत आपण काही काळ विश्रांती घेत असल्याचं सांगत कमोथेरपी आणि रेडिएशनचे उपचार सुरु केले होते. पण त्यानंतर त्यांनी आपल्याला तुरुंगात गेल्यापासून हा त्रास सुरु होता पण त्याकडं दुर्लक्ष करत होतो, असं २०२५ मध्येच म्हटलं होतं. त्यानंतर त्याचा त्यांनी आज जाहीर कार्यक्रमात पुन्हा उल्लेख केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.