Prakash Ambedkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा; भाजपला 'ती' चूक भोवणार !

Sachin Deshpande

Maharashtra Loksabha Election 2024 : इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपने औषध निर्मात्या कंपन्यांकडून मोठा निधी जमा केला. त्या औषध निर्मात्या कंपन्यांनी इलेक्टोरल बाँडमधून भाजपला निधी देत रुग्णांना कमी दर्जाची औषधे तर दिली नाही ना, असा प्रश्न वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले असतील आणि त्यांना मृत्यूचा सामना करावा लागला असेल, तर या सर्व पापाचे धनी कोण ? असा गंभीर आरोप वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केला आहे. ते अकोल्यात दैनिक 'सकाळ' कार्यालयात सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते. ज्या प्रकारे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचे काम काँग्रेसने केले. त्याचप्रमाणे आता काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष त्यांना (Prakash Ambedkar) पाडण्यात अग्रेसर असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

राज्यात वंचित विरोधात भाजप अशीच लढत होत आहे. काँग्रेस, एनसीपी ही रेसमध्ये नाही. नागपूर येथे विकास ठाकरे यांना आम्ही पाठिंबा दिल्याने ते रेसमध्ये आले आहे. वंचित विरोधात भाजप अशीच निवडणूक होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित विरोधात भाजप याच प्रमुख लढती असून, त्याचा फटका इतरांना बसण्याची चिन्हं आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्यात सरस कोण

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांपैकी कोण सरस, असे आंबेडकरांना विचारले असता शिवसेनेच्या फुटीने एकनाथ शिंदे यांची प्रतिमा थोडी डागाळली होती. पण, राज्य सरकारच्या कामकाजाने शिंदे यांची प्रतिमा थोडी उजळली असल्याचे आंबेडकर म्हणाले.

नाथाभाऊंचा भाजप पुनर्प्रवेश....

भाजपने रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवत एकनाथ खडसे यांना गळाला लावले. रावेर आम्ही महाविकास आघाडीच्या मदतीने शिवसेनेला सोडण्याची मागणी केली होती. तसा संवाद शरद पवार यांच्यासोबत झाल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. पण, भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी कायम ठेवत नाथाभाऊंना गळाला लावल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

चंद्रहार यांच्या नशिबी हार की ....

चंद्रहार पाटील यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून कुऱ्हाड मारून घेतली. तीन महिन्यांअगोदर चंद्रहार पाटील वंचित नेते आंबेडकरांना भेटले. पश्चिम महाराष्ट्रात तीन गावाच्या पाठीमागे एक तालीम आहे. बऱ्यापैकी त्यांनी संपर्क केला. परंतु शिवसेनेने त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला. चंद्रहार यांनी अपक्ष लढण्याचे आश्वासन दिले होते. शिवसेनेने चंद्रहार यांना बाटविल्याने त्यांच्या बाजूने सर्वपक्षीय समर्थन आता त्यांना मिळणार नाही. सहजपणे अपक्ष चंद्रहार पाटील जिंकले असते आता संघर्ष करावा लागेल. या संघर्षात चंद्रहार पाटील जिंकतात की नाही हे पाहण्यासारखे ठरेल.

एमआयएमचा पत्ता का केला कट....

एमआयएमबरोबर आम्ही बसणार नाही. इम्तियाज जलिल यांना जिंकविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. एमआयएमला आम्ही सहकार्य केले. त्यामुळे ओबीसींमध्ये जिंकण्याची आशा निर्माण झाली. ही आशा मातीत मिसळविण्याचे काम एमआयएमने वाॅकआउट केल्याने निर्माण झाली. त्यामुळे यापुढे थेट मुस्लिमांना आम्ही संधी देणार त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा विस्तार करणार आणि एमआयएम सोबत यापुढे वंचित जाणार नाही, असे ठाम मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. अकोल्यातील दैनिक 'सकाळ' कार्यालयात सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

RSS धड प्रचार करू शकतं ना समर्थन....

संघ हा भाजप प्रचाराचा बॅकबोन आहे. वंचितचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत वैचारिक मतभेद आहे. RSS कार्यकर्ता त्याच्या विचारधारेशी प्रामाणिक होता. आज त्याला प्रचारात सर्वात मोठी अडचण फेस करावी लागत आहे. भाजपने पक्षामध्ये भ्रष्टाचारी घेतले. अनेक संघ पदाधिकाऱ्यांना याचे उत्तर द्यावे लागत आहेत. त्यांच्याकडे उत्तर नाही. हा मोठा ड्रा बॅक भाजपला फेस करावा लागत आहे. भाजपमध्ये करप्ट राजकीय नेत्यांच्या प्रवेशाने आता प्रचारामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांची गोची झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे संघ स्वयंसेवक ना धड समर्थन करू शकत आहे ना धड प्रचार करू शकत आहे.

एकीकडे ईडी चौकशीची ससेमिरा, दुसरीकडे मोदींद्वारे थेट भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नेते भाजप मध्ये प्रवेश करत आहे. त्याच बरोबर भाजपला पाठिंबा देत आहे. हा सर्व प्रकार भाजपची मातृसंस्था आरएसएससाठी त्रासदायक असून, त्यामुळे RSS व संघ पदाधिकाऱ्यांची गोची झाल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. राजकारणात भाजपचे झालेले काँग्रेसीकरण याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत राजकारणात संघ हा भाजपचा बॅकबोन होता. RSS चा तो ताठ कणा आता मोडल्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली. याचा फटका हा लोकसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. जे कॅडर भाजपसाठी निवडणुकीत काम करायचे ते कॅडर आता भाजपपासून दूर गेले आहेत. ते जनतेत जाऊ शकत नाहीत. भ्रष्टाचारांच्या प्रवेश आणि पाठिंब्याचे उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे भाजप नेते अडचणीत सापडल्याचा दावा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT