Rajshree Patil, Navneet Rana, Ramdas Tadas, Prataprao Jadhao, Prakash Ambedkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidharbha: विदर्भात दुरंगी, तिरंगी लढत; 'त्या' आठ मतदारसंघांत 53 उमेदवारांचे अर्ज अवैध !

Sachin Deshpande

Maharashtra Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत दुरंगी आणि तिरंगी लढत होणार आहे. यात वंचितचा महत्त्वाचा रोल असेल. पण, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात वंचितच्या अतिआत्मविश्वासाने पक्षाचा उमेदवार रिंगणाबाहेर गेला. त्यामुळे महायुती आणि महाविकास यांच्यात थेट लढत होईल.

लोकसभा निवडणुकीची रंगत हळूहळू जोर धरत आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येत उमेदवार अर्ज अवैध ठरल्याने राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसला रामटेकमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यात वंचितला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात फटका बसला आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसणे, उमेदवाराद्वारे इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, त्यामुळे उमेदवारी अर्ज अवैध ठरण्याचे प्रमाण वाढले आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा, काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे, प्रहार उमेदवार दिनेश बूब यांच्यात तिरंगी लढत होईल. अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित उमेदवार प्रकाश आंबेडकर, काँग्रेस उमेदवार डाॅ. अभय पाटील, भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदारसंघात 17 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत यात मोठा बदल होण्याची चिन्हं आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपचे निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांचा अपक्ष म्हणून अर्ज वैध ठरलेला आहे, तर महायुतीचे तसेच शिवसेना पक्षाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांची थेट लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यासोबत होईल. त्याचबरोबर गेल्या वेळेस वंचितने लाखो मते घेतली होती. या वेळी वंचित नेते वसंत मगर यांना तिकीट दिले आहे, तर रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून येथे लढत आहेत.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत होईल. येथे महायुती विरोधात महाविकास असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरोधात महाविकास अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्या विरोधात थेट लढत होईल.

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार व उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात सामना होणार आहे. येथे वंचितचे उमेदवार प्रा. राजेंद्र साळुंखे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघांत एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघांत एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. यात बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशीम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल ही असून, या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होईल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT