Maharashtra Assembly Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly News : जब्बारांनी रिल्स लाइफमधून जपलेली 'डिग्निटी' सत्ताधाऱ्यांनी रिअलमध्ये धुळीस मिळवली!

Rajanand More

Mumbai News : विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly News) सुरू असताना आज मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात आवारातच बाचाबाची झाली. यावरून अधिवेशनात विरोधी आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला, पण असे काही घडलेच नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्यात आली. विरोधकांच्या हाती आयता मिळालेला हा मुद्दा सहजासहजी ते सोडणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar) या मुद्द्यावरून महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाकडून अधिकृत एक्स हँडलवर एक पत्र पोस्ट करण्यात आले आहे. रस्त्यावरचं गँगवॉर आता प्रतिभावान राजकीय परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पायऱ्या चढून लॉबीपर्यंत येऊन पोहोचलंय. अशावेळेस जेव्हा विधिमंडळच सत्ताधारी असंविधानिक महायुती सरकारला पत्र लिहून आपल्या भावना मांडते, असे राष्ट्रवादी नमूद करण्यात आले आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

प्रति महायुती सरकार,

सन्माननीय आमदारांनो, मी विधिमंडळाची इमारत बोलतेय. आजवर मी अनेक सरकारे पाहिलीत, पण माझा अवमान करणारं सरकार पहिल्यांदाच पाहतेय. तुम्ही मला या महाराष्ट्राच्या (Maharashtra) लोकशाहीचं एक पवित्र स्थान म्हणता, पण आज हेच त्थान कलुषित झालं, जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात माझ्या आवारात भिडू लागले. महाराष्ट्राने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलं. फोडाफोडीचं राजकारण (Politics) करून असंविधानिकपणे तुम्ही सत्तेतही आलात. पण कै. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्या भिंतींनाही महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा स्वाभिमान आहे. सबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो. पण जेव्हा रस्त्यावरचं गँगवॉरच माझ्या आवारात घडतं, तेव्हा गेली अनेक वर्षे बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानालाच तडा जातो. महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष म्हणजे मी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण बदलाचे निर्णय झाले, ते माझ्याच आवारात. मग तो महिला सक्षमीकरणासाठी 33 टक्के आरक्षणाचा असो की वडिलांच्या मालमत्तेत मुलीला समान अधिकार देण्याचा. तो लाखो रोजगार उपलब्ध करून देणारा एमआयडीसी निर्माणाचा असो की, आयटी पार्कचा. तो निर्णय सर्व शिक्षा अभियानाचा असो की, व्यावसायिक शिक्षणाचा, दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी फोर्स वनच्या स्थापनेचा असो की, महाराष्ट्र जलसिंचनाने सुजलाम सुफलाम करण्याचा. शेतकरी समृद्धीचा की डान्सबार बंदीचा, असे कित्येक सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेतले गेले ते माझ्याच आवारात.

पण आजचं सरकार निर्णय घेतंय ते आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे, तर दिल्लीच्या आणि गुजरातच्या हितासाठी. विधिमंडळ म्हणून जी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, पण तुम्ही सत्तेवर आलात आणि माझ्याच आवारात कार्यरत आहात, ते स्वतःच्या मंत्रिपदाचे, खुर्चींचे आणि सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी. माझ्याच आवारातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन आपण अभिवादन करता, पण इमारतीत येऊन मात्र गँगवाॅर करता. आज भर अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांमध्ये झालेली बाचाबाची पाहिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद पवारसाहेब व सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या (Yashwantrao Chavan) भेटीची गोष्ट सांगाविशी वाटते.

त्यावेळी कै. चव्हाण साहेव जब्बार पटेल यांना म्हणाले, "जब्बार फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यासाठी अनेक लोकांचे बळी गेलेत. विधानसभेत जे काम चालतं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतं. त्या सभागृहाला एक 'डिग्निटी' असते. जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका." जब्बारांनी रिल्स लाइफच्या माध्यमातून ही 'डिग्निटी' जपली. परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांनी रिअल लाइफमध्ये 'माझी' डिग्निटी धुळीस मिळवली आहे, याचं वाईट वाटतं!

आपला,

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT