Mumbai News : राज्यातील रिक्त होत असलेल्या नऊ जागेसाठी विधान परिषदेची 12 मे ला निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीमधील भाजपच्या वाट्याला पाच जागा येत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला राज्यातील दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्र्वादीच्या वाट्याला एक जागा येत आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र, कोणत्याच राजकीय पक्षाकडून अद्याप विधानपरिषदेसाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील नऊ जागेची मुदत 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच अद्याप कॊणत्याच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. भाजपच्या गोटातील 30 जणांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहेत. त्यामधील पाच नावांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते तर दुसरीकडे एका जागेच्या पॊटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास फायनल असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दोन नावावरून जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. या दोन जागेपैकी एका जागेसाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव जवळपास फायनल आहे. तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी या दोन्ही नावाला विरोध केला असल्याचे पुढे आले आहे. त्यासोबतच अभिजित अडसूळ, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांच्या नावाची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात दावेदार आहेत. निवृत्त होत असलेल्या अमोल मिटकरी, सोबतच माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे, उमेश पाटील, सुरेश बिराजदार यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी एकाला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणाचे नाव फायनल होणार याची चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आल्यास निवडणूक बिनविरोध होणार
महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीतील नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीकडून जर उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आले, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असतानाही कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.