

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागेसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वच पक्षात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येत आहेत. या दोन जागेसाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुदत संपल्याने त्या निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या नावाबाबत मात्र शिवसेनेत दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
महिनाभरापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी धक्कातंत्राचा वापर करीत सोलापूरच्या पक्षप्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना अचानक संधी दिली. त्यामुळे त्याच प्रमाणे येत्या आकळत होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करणार का ? यावरून उत्सुकता शिगेला पोंहचली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या नेतेमंडळींची धाकधूक वाढली आहे.
विधानपरिषदेच्या दोनपैकी एका जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसऱ्या जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून सध्या 'सोशल इंजिनिअरिंग' आणि 'निष्ठा' या दोन मुद्द्यांवर विचार करण्यात येत आहे. त्यामुळे या पदासाठी अनेक नेते इच्छुक आहेत.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांचे नाव चर्चेत आहे. त्यासोबतच पक्षाच्या आक्रमक प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शायना एनसी, मुख्यमंत्री शिंदेंचे अत्यंत विश्वासू व माजी आमदार रवींद्र फाटक, पुण्यातील नेते रोहित टिळक, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यासोबतच गेल्या दोन दिवसापासून या पदासाठी माजी मंत्री व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आले आहे.
बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे या पदासाठी नाव चर्चेत आले असले तरी त्यांचा या पदासाठी होकार येणे बाकी आहे. त्यामुळे या पैकी कोणाचे नाव फायनल होणार यावरून उत्सुकता लागली आहे.