मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रकरण न्यायालयीन वळणावर जाण्याची शक्यता आहे.
Sangli News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून सत्तेतील काही मंत्री आणि आमदार सतत बेलगाम द्वेषपूरक वक्तव्य करताना दिसत आहे. यांच्या या वक्तव्यावरून समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देरेंद्र फडणवीस यांच्याही भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर फडणवीस यांनी आपली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असून इतर कोण काय बोलतात हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते. पण त्यांनी द्वेषपूरक वक्तव्य करणे योग्य नसल्याचे म्हणत मंत्री नितेश राणे यांचे कान टोचले होते.
यानंतर आता याच मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही लोकप्रतिनिधी विरोधात तक्रार करूनही टाळाटाळ करणाऱ्या राज्यपालांविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचा थेट इशाराच अॅड असीम सरोदे यांनी दिला आहे. यामुळे आता सतत एका समाजाविरोधात जातीय तेढ निर्माण करणारे बेलगाम द्वेषपूरक वक्तव्य मंत्री नितेश राणेंसह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांना भोवण्याची शक्यता आहे.
बेलगाम द्वेषपूरक वक्तव्ये करीत घटनात्मक पदाच्या जबाबदारीचे अवमूल्यन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना न्यायालयात खेचण्यात येणार असल्याची माहिती ॲड. असिम सरोदे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्री नीतेश राणे यांच्याविरोधात माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह राज्यपालांकडे याआधीच तक्रार दिली आहे. यावेळी ॲड. अमित शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात घातपात असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
ॲड. सरोदे म्हणाले, ‘‘ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, अशाच मंडळीकडून जेव्हा समाजात जातीय द्वेष निर्माण करणारी विधाने सातत्याने केली जात आहेत. या मंडळींना अभय देणारे पोलिस आणि त्या पक्षाचे नेतेही तितकेच जबाबदार आहेत. हा प्रकार समाजविघातक आहे. याला कुठेतरी पायबंद घातलाच पाहिजे. त्याची ही सुरुवात आहे. आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली आहे. आता पुढचा टप्पा न्यायालयाचा असेल. राज्यात नगर, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील काही आमदारही अशी बेलगाम विधाने करीत आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल.’’
ते म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची शहनिशा सर्वांगाने व्हावी, ही मागणी योग्य आहे. आमदार रोहित पवार यांची दखलपात्र फिर्याद का घेतली जात नाही? विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडत नाही, हे विधान बेजबाबदारपणाचे आहे. हा घातपात असावा, असे सबळ पुरावे पुढे येत असून मलाही तसा दाट संशय आहे. या प्रकरणात विमान कंपनीविरोधात आमदार रोहित पवार यांनी केलेली वक्तव्ये गंभीर असून त्याची दखल तपास यंत्रणांनी घेतली पाहिजे. ’’
‘हक्कभंगासाठी प्रयत्न’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान याने ७५ हजार हिंदूंची कत्तल केल्याचे विधान विधानसभेच्या सभागृहात केले. त्यांच्या या विधानाला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. राज्यातील आठ ज्येष्ठ इतिहास अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला असून त्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ पुरावे द्यायची मागणी केली जाईल. सभागृहात धांदात खोटे बोलण्याची ही परंपराही खंडित केली पाहिजे. त्यासाठीही यापुढे नागरी पातळीवर सतर्कता दाखवण्यात येईल. आम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांनाही भेटलो आहोत. सभागृहात मुख्यमंत्र्यांना पुरावे द्या, अन्यथा हक्कभंगाचा ठराव आणावा,अशी मागणी करावी,अशी आम्ही आमदारांकडे मागणी केली आहे.
1. वाद नेमका कशावरून निर्माण झाला आहे?
काही मंत्री व आमदारांच्या कथित द्वेषपूर्ण वक्तव्यांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2. कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची नावे चर्चेत आहेत.
3. अॅड असीम सरोदे यांनी काय इशारा दिला आहे?
राज्यपालांकडून कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
4. राज्यपालांविरोधात आरोप काय आहेत?
तक्रारीवर टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
5. पुढील घडामोडी काय असू शकतात?
प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यास संबंधितांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.