Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप 25 मार्चला वाजणार आहे. शेवटचे तीनच दिवस शिल्लक असल्याने विधिमंडळात एकीकडे आमदारांची धांदल सुरु आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ आमदारांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार असल्याने हे सदस्य विधानपरिषदेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत असल्याने त्यांचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेतून त्यांना निरोप देण्यात येणार आहे. मे महिन्यात त्यांचा कालवधी संपणार असल्याने पुढच्या महिन्यात या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतील आमदारातून निवडून द्यावयाच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या नऊ जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. सोमवारी विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह कार्यकाळ संपत असलेल्या नऊ आमदारांना निरोप देण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे.
या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे चार, एकत्रित शिवसेनेचे दोन, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन व एक काँग्रेसच्या आमदाराची वर्णी लागली होती. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेडॉ. नीलम गोऱ्हे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) अमोल मिटकरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत.
या नऊ पैकी सहा सदस्यांनी जवळपास सहा वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. तर भाजपच्या तीन सदस्यांना साधारण दीडच वर्ष या पदावर काम करता आले आहे. सुरुवातीच्या काळात भाजपचे प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, रमेश कराड याठिकाणी बिनविरोध निवडून आले होते. मात्र नोव्हेबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत दरेकर, पडळकर, कराड विजयी झाल्यानंतर त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी उर्वरित दीड वर्षासाठी संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर यांची निवड करण्यात आली होती.
आतापासूनच उत्सुकता शिगेला
आता हे नऊ सदस्य विधानपरिषदेतुन निवृत्त होत असल्याने सोमवारी त्यांना निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे आता निवृत्त होत असलेल्या या नऊ सदस्यांपैकी कोणते सदस्य पुन्हा विधान परिषदेवर निवडून येणार याची उत्सुकता लागली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता एक आमदार निवडून येण्यासाठी 28 आमदारांची गरज आहे. त्यानुसार भाजपचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर महविकास आघाडीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने आता येत्या काळात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.