devendra fadnavis eknath shinde sunetra pawar Mahayuti Government Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

Mahayuti politics News : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्याने आता विधानपरिषदेच्या 17 मतदारसंघातील निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुतीमधील मित्रपक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहवयास मिळणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 विधान परिषदेच्या जागासाठी सोमवारी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. गेल्या नोव्हेंबरपासून राज्यात निवडणुकीचा माहोल आहे. सुरुवातीला डिसेंबरमध्ये राज्यातील 283 नगरपालिका व नगरपंचायती तर जानेवारीमध्ये 27 महापालिकांच्या तर फेब्रुवारी महिन्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्याने आता विधानपरिषदेच्या 17 मतदारसंघातील निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुतीमधील मित्रपक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहवयास मिळणार आहे.

तीन पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे-पालघरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली, अहिल्यानगर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ या सात मतदारसंघामध्ये महायुतीमधील तीन पक्ष पुन्हा एकदा उमेदवारीवरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यातून निवडून द्यावयाच्या राज्यातील जवळपास त्यानुसार १८ जूनला मतदान होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता वेगवान घडामोडी घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा उमेदवारीवरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

या मतदारसंघातील पक्षीय बलाबाल पाहता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपकडे (BJP) तब्बल ४४४ मतांचे संख्याबळ असून, शिंदे यांच्या शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप स्पष्टपणे वरचढ ठरत असताना, शिवसेनेसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच ही निवडणुक जाहीर झाल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोकणमधील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहील आहे. मात्र आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील तीन पक्षातच जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मतदारसंघात वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर महायुतीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली असून तीन क्रमांकावर आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचे संख्याबळ अधिक आहे. याठिकाणी एकूण ८३१ मतदार आहेत. यामध्ये एकट्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सदस्यांची संख्या २८९ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ त्यांच्याकडे असल्याने या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. तर भाजपचे संख्याबळ २८५ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांची संख्या केवळ १०६ इतकी मर्यादित आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये कॊणत्या पक्षाला जागा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांची एकूण संख्या सुमारे ८०४ इतकी आहे. त्यात सर्वाधिक ३४७ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यानंतर भाजपचे ३१९, शिवसेनेचे ६८ सदस्य आहेत. काँग्रेसचे १९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ सदस्य आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ सर्वाधिक असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. पण दौंड नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजप खेचून आणणार याकडे लक्ष लागले आहे.

परभणी-हिंगोली दोन्ही जिल्ह्यातील संख्याबळ पाहता या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला जागा येऊ शकते. मात्र, दुसऱ्या नंबरवर असलेल्या भाजपला देखील संधी आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. परभणी विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे सेना ज्यापद्धतीने आक्रमक झाली होती. त्याप्रमाणे हटाला पेटून उमेदवारी मिळवण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीमध्ये दोन पक्ष एकत्रित आल्यास तिसऱ्या पक्षाच्या बंडाचा फारसा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीतून कोणता पक्ष निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. एकीकडे शिवसेनेने माजी आमदार विप्लव बजोरियला निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारीवरून तीन पक्षात रस्सीखेच दिसणार आहे.

यवतमाळ मतदारसंघातील पक्षीय बळ पाहता भाजप-१३७, शिंदेसेना-९३, काँग्रेस-११०, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार-२८, शिवसेना ठाकरे- ३०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार-०४, वंचित आघाडी-६, बसपा-१, सपा-१, अपक्ष-२१, एमआयएम-०६,मनसे ३, जनशक्ती-६ असे आहे. याठिकाणी भाजपकडून मदन येरावार, सुमीत बाजोरीया, नितीन भुतडा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सलीम खेतानी, पांडव, साहेबराव कांबळे इच्छुक आहेत.

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ज्येष्ठ नेते तथा दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर तब्बल साडेतीन वर्षे रिक्त असलेली ही जागा भरली जाणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही जोरदार दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. उमेदवार काळ असणार यावरून उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

जालना, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ तात्पर्यन्त शिवसेनेचा गड होता. आता मात्र चित्र बदलले आहे. दोन्ही महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर संभाजीनगरची जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पैकी 6 नगरपालिका या भाजपच्याच ताब्यात आहेत. जालना जिल्ह्यातील 3 पैकी 2 नगरपालिकांवरही भाजपचीच सत्ता आहे. या जोरावरच भाजप या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगू शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे या जागेवर दावा सांगू शकतात. महायुतीकडे विजयासाठीचे पुरेसे संख्याबळ असल्याने आणि महाविकास आघाडीतील विरोधी पक्षामध्ये फारसा उत्साह नसल्याने ही निवडणूक महायुतीला अवघड जाणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. परंतु यासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये एकमत होणे महत्वाचे असणार आहे.

SCROLL FOR NEXT