महायुतीत राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने भाजपच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू आणि झिशान सिद्दीकी यांना विधान परिषद तिकीट देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.
Maharashtra MLC Election NCP-Shivsena Vs BJP : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडमोडी घडत आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालचाली होताना दिसत असतानाच राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचा विरोध असतानाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंसह झिशान सिद्दीकी यांना जवळ करत विधान परिषदेचे तिकीट दिले आहे. यामुळे महायुतीतीलच मित्र पक्षांनी भाजपला शांततेत प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बच्चू कडू यांनी तब्बल 27 वर्षांनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत प्रवेश करत शिंदेंच्या शिवसेनेचे शिव धन्युष्य हाती घेतले आहे. मात्र त्यांनी यावेळी हार जनशक्ती पक्ष शिंदे सेनेत विलीन न करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांना आता शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता आहे. पण शिंदेंच्या या निर्णयाला भाजपचा अंतर्गत विरोध असल्याचे म्हटले जात आहे.
बच्चू कडू यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या घडामोडींमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झालीय. कडूंच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे. कडूंचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी विदर्भातील नेत्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला. तर भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने शिंदेंवर दबाव वाढवून प्रहारचे विलिनीकरण रोखण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या विरोधाचे कारण हे विदर्भात कडूंची असणारी ताकद मानली जात आहे. तर कडूंच्या प्रवेशामुळे शिवसेनेला अमरावतीसह मराठवाडा आणि राज्यात ताकद मिळू शकते. तसेच कडू यांची भाजप नेते आणि मुख्यमत्र्यांच्या विरोधात सातत्याची जाहीर टीका, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभवात कडूंचे टायमिंग आहे.
याशिवाय दिव्यांग नागरिकांचा बच्चू कडूंना मोठं समर्थन असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात आणि विशेषत: अमरावतीत डोकेदुखी वाढू शकते. तसेच कडूंना ग्रामीण भागात मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही भाजपचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. पण आता कडू यांच्या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
तसेच राष्ट्रवादीने देखील भाजपच्या विरोध जाऊन निर्णय घेतला आहे. अजितदादांनंतर राष्ट्रवादी भाजपच्या कह्यात जाईल असे म्हटले जात होते. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिशान सिद्दीकी यांना भाजपच्या विरोधानंतरही विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. भाजपने झिशान सिद्दीकींना अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम) असल्याने उमेदवारी देऊ नये म्हणून प्रयत्न केला होता.
पण ज्याप्रमाणे अजितदादांनी भाजपसोबत जाऊनही अल्पसंख्यांक समाजाला जवळ ठेवलं होतं. तसेच झिशान यांच्या रुपाने सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक बाणा कायम ठेवला आहे. झिशान सिद्दीकींना उमेदवारी देऊन सुनेत्रा पवार यांनी भाजपला तगडा मेसेज दिला आहे. तर वांद्रे भागातील मुस्लिम मतपेढीवर झिशान सिद्दीकींचे वर्चस्व असल्यामुळे त्यांची उमेदवारीला राजकीय महत्त्व आहे.
याआधी अजितदादांनी नवाब मलिक यांना भाजपने विरोध केला होता. नवाब मलिक यांना बाजूला ठेवण्यास सांगितले होते. पण अजितदादांनी मलिक यांच्यावर कायम विश्वास ठेवला. विधानसभेला नवाब मलिक आणि सना मलिक यांना उमेदवारी दिली. यातील सना मलिक निवडून आल्या. तसाच प्रयत्न मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही भाजपने केला.
भाजप नेते अशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांनी मलिक यांना बाजूला ठेवा तरच युती होईल असे म्हंटलं होते. त्यानंतरही अजितदादांनी मलिक यांना लांब केले नाही, भाजपसोबत युती न करता मुंबई महापालिका लढले. तर आताही झिशान यांना उमेदवारी देऊन अजित पवार नसले तरी मी त्यांचीच विचारधारा पुढे चालवणार असा मेसेज सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं दिसतं.
झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्व विधानसभा जागेवरून स्थानिक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध होता. ती जागा महायुतीतील मित्रपक्षांना हवी होती. पण काँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी दिंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळवली.
पण भाजपच्या विरोधाचे प्रमुख कारण हे झिशान सिद्दीकींनी वडील बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भाजप नेत्यावर संशय व्यक्त केला होता. तसेच भाजप अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करत असून आपण मुस्लिम असल्यामुळेच लक्ष्य केले जात आहे का? असा सवालही उपस्थित केला होता. ज्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
1. महायुतीत काय घडले आहे?
राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या विरोधात निर्णय घेत तिकीट वाटप केले.
2. कोणाला विधान परिषद तिकीट देण्यात आले आहे?
बच्चू कडू आणि झिशान सिद्दीकी यांना तिकीट देण्यात आले आहे.
3. भाजपची भूमिका काय आहे?
भाजपने या निर्णयाला विरोध दर्शवला असल्याचे सांगितले जात आहे.
4. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
महायुतीत अंतर्गत तणाव वाढून युतीवर परिणाम होऊ शकतो.
5. हा निर्णय का महत्त्वाचा आहे?
कारण यामुळे युतीतील पक्षांमध्ये मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.