NCP Political News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra NCP Politics : सरकारमध्ये राष्ट्रवादीची चलती, कानामागून आले अन् तिखट झाले...

Jagdish Pansare

Shivsena UBT News : गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक रंग उधळले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले, पण बंद खोलीतील शब्द न पाळल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी थेट काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. (Maharashtra Political News) सर्वसामान्य शिवसैनिकाला मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले.

त्याचा व्हायचा तो परिणाम अडीच वर्षांतच झाला, (Ajit Pawar) अजित पवारांकडून निधी वाटपात दुजाभाव केला जातो, मुख्यमंत्री वेळ देत नाही, अशी कारणे पुढे करत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ४० आमदार घेऊन बाहेर पडले. सरकार पडले, ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद गेले आणि शिवसेना नाव तसेच धनुष्यबाण चिन्हही त्यांना गमवावे लागले. अवघ्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत जाण्याची मोठी किंमत चुकवावी लागली.

ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना आकाश ठेंगणे झाले. (BJP) भाजप आता आपल्यासाठी लाल कारपेट अंथरणार, मंत्रिपदे, पालकमंत्री, महामंडळे अशी स्वप्न रंगवली. शिंदेंना तर मुख्यमंत्रिपदाची लाॅटरीच लागली. (Shivsena) पहिल्या मंत्रिमंडळात शिंदेंसोबत गेलेले अनेकजण मंत्रीही झाले, उरलेल्यांना विस्ताराच्या आॅक्सिजनवर ठेवण्यात आले, पण अचानक भाजपने लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत रणनीती आखली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार पाहता भाजपने बी प्लान आखला आणि अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतही बंड झाले. ३० ते ३५ आमदारांच्या पाठिंब्यासह अजित पवार सत्तेत आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.

त्यांच्यासोबत आलेल्या ९ जणांना थेट कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेले आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून तयार असलेल्या अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले.

आधी आर्धी भाकरी मिळणार होती, आता चतकोरच खावी लागेल, अशी उद्विग्नता शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांकडून बाहेर पडायला लागली. ९ महिने सुखाने सुरू असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीने मिठाचा खडा पडला.

अजित पवार यांचे राजकारण आणि कामाचा अवाका पाहता ते शिंदे गटाला भारी ठरणार हे पहिल्याच झटक्यात ९ कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेत त्यांनी दाखवून दिले होते. हा सिलसिला एवढ्यावरच थांबला नाही, निधी देतानाही अजित पवारांची दादागिरी दिसून आली.

पण शिंदे गटाला बोलण्याची सोय राहिली नाही. आपल्याला हवं ते मिळवून घेण्यात अजित पवारांचा हातखंडा आहे. पालकमंत्री पदासाठी दिलेल्या यादीवर निर्णय होत नाही, असे दिसताच अजित पवारांनी आपल्या नाराजीचे अस्त्र बाहेर काढले.

वर्षावर जाणे टाळणे, बैठकांना दांडी मारणे यामुळे शिंदे- फडणवीसांवर त्यांनी दबाव वाढवला, मग दोघांनी दिल्ली गाठली आणि अखेर अजित पवारांनी दिलेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीवर शिक्कामोर्तब झालेच.

पुण्याचे पालकत्व स्वतःकडे घेत भाजपच्या दादांची उचलबांगडी करण्यातही अजित पवार यशस्वी ठरले. सत्तेत येऊन तीन महिन्यांत अजित पवारांनी जे मिळवले, ते शिंदे गटाला अकरा महिन्यांत मिळवता आले नाही.

अजूनही त्यांचे आमदार मंत्रिमंडळ विस्तार होणारच, लवकरच होणार अशा प्रतिक्रिया थकलेल्या चेहऱ्याने माध्यमांना देताना दिसतात. ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची चलती अन् शिंदे गट गॅसवर अशीच सध्याची परिस्थिती आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT