Aditya Thackrey sarkarnama
महाराष्ट्र

MVA meeting update: मविआच्या गोटात 'सस्पेन्स'! राज्यसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक; बैठकीला आदित्य ठाकरेंची दांडी

Aditya Thackeray absence News : राज्यसभेच्या एका जागेचा तिढा सोडवण्यासाठी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मंत्री आदित्य ठाकरे अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यसभेच्या राज्यातील रिक्त होत असलेल्या 7 जागेसाठी 16 मार्चला मतदान होणार असल्याने वातावरण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आली आहे. या एका जागेवरूनच आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच गुरुवारी राज्यसभेच्या एका जागेचा तिढा सोडवण्यासाठी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मंत्री आदित्य ठाकरे अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

राज्यसभेच्या एका जागेवरून मविआमधील तीनही घटक पक्षात गेल्या काही दिवसपासून बैठकीचा सिलसिला सुरु आहे. आघाडीच्या प्रमुख नेत्याची गुरुवारी सकाळी बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी अडून बसले आहेत, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यातच दुपारी झालेल्या महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, या बैठकीस आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरे ही राज्यसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडावी, यासाठी आग्रही आहेत. मात्र, तेच गुरुवारी झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते.

दरम्यान, गुरुवारी विधिमंडळाच्या आवारातच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या प्रमुख नेत्यांसह झालेल्या या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी राजकीय समीकरणांवर भर दिला.

राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे. त्यानुसार महायुतीमधील भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे सहा खासदार निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षाचे संख्याबळ 46 इतके आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांचा राज्यसभेच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेवर दावा आहे. त्यामुळे या तीन पक्षांमधील पेच कायम आहे.

गुरुवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यसभेच्या या एकमेव जागांसाठी अडून बसले असले तरी, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. काँग्रेसने या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीला कळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील गुरुवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेऊन बैठकीचा तपशील देणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितली असल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे मत ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT