Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News  Sarkarnama
महाराष्ट्र

Jarange and Bhujbal News :''तुम्ही तर जीव घ्यायला निघाला होता...'' भुजबळांना प्रत्युत्तर देताना जरांगेंचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Manoj Jarange News : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात मागील अनेक दिवसांपसून आऱोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं, यासाठी तिथे पाठवण्यात आलेले दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळावरून आपली जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको असं भुजबळांनी सांगितलं. तसेच, ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांनाच आरक्षण मिळावं, त्यांच्या नातेवाइकांना नको, अशी भूमिकाही भुजबळांनी मांडली. भुजबळांच्या विधानांवर मनोज जरांगेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, ''आम्हीतर पहिल्या दिवसापासून म्हणतोय की उद्रेक, जाळपोळ करायची नाही. यामध्ये कोणत्याच समाजाचं भलं नाही. ते जर म्हणत असतील की ओबीसी किंवा माळी समाजाला लक्ष्य केलं. आम्ही कुठं म्हणालो की आलेले सगळे ओबीसी मंत्री बीडलाच भेटायला चालले, कोणी इकडे आलंच नाही. आम्ही म्हणालो का तुम्ही का बीडला जात आहात? ज्या ठिकाणी चांगली घटना घडली नाही, त्या ठिकाणी कोणी जात वापरून थोडीच जातो. तशीच घटना आमच्याकडेही झाली होती, तुम्ही कुठं आलात आमच्याकडे धावपळीने.''

''कोणीही जबाबदारीने बोललं पाहिजे. आमचे साखळी उपोषण, आमरण उपोषण करणारे पोरं, ज्यांनी शांततेत रास्ता रोको केला आणि घराकडे परतले. मात्र, मराठा समाजाचे आंदोलन बदनाम व्हावं यादृष्टीने ज्यांनी प्रय़त्न केले. आमची पोरं शांततेत ज्या दिवशीपासून आंदोलन करत होते, त्या दिवशीपासून रोष धरून, ते पोरं आता लक्ष्य केली जात आहेत. विनाकारण त्यांना आत टाकलं जात आहे. त्यांच्यावर कारवाई करू नका,'' असं आमचं म्हणणं आहे.

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींचं आरक्षण संपायचं आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत. यावर जरांगे म्हणाले, '''आम्हाला आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण कसं संपेल?. घटनेनेच सांगितलं आहे की, ओबीसींना आरक्षण देताना आयोग स्थापन करा आणि आरक्षण द्या. फक्त जे आयोगाच्या माध्यमातून आयोगाला पुढे करून, त्याच्या आड लपून जे जास्तीचं खाल्लं जातंय. जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे, तेच द्या म्हणतोय. आम्ही कुठं गोळाबेरीज करतोय, की ओबीसीमध्ये इतक्या छोट्या जाती आहेत, इतक्या नाही आहेत. आम्ही फक्त जे आमचं आहे त्या द्या असं म्हणतोय.''

याशिवाय जरांगेंना सर, सर करत न्यायाधीश पाठवतात, न्यायाधीश पाठवणं ही चूकच होती. मात्र, अशांकडून काय अपेक्षा कऱणार? असंही भुजबळ म्हणाले होते. यावर जरांगे म्हणाले, ''नाही त्याला चूक नाही म्हणता येणार. आता तर खूप खालचं बोलायला लागले आहेत, असं म्हणता येईल भुजबळ. या देशात न्यायदानाचं काम न्यायाधीश करतात आणि एक जीव वाचवण्याचं काम त्यांनी केलं. जर अशी भावना त्या जीव वाचवणाऱ्याविषयी. कारण, जनता म्हटल्यानंतर सध्या सत्तेत ते आहेत आणि आम्ही जनतेत मोडतोय. कारण, एका जनतेचा जीव वाचवायला जर न्यायाधीश येणार असतील आणि त्याला जर तुमची अशी भाषा असेल, तर मग काय बोलावं तुमच्याबद्दल?

सरन्यायाधीश, मंत्र्यांनी येऊन एक जीव वाचवायचंच काम केलं. तुम्ही तर जीव वाचवायला तयार नाहीत कोणाचा. तुम्ही तर जीव घ्यायला निघाला होता, आमच्यावर प्राणघातक हल्ला करून.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT