Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad
Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : अधिवेशनात राजीनाम्याची मागणी करणारे दानवे सत्तारांच्या निशाण्यावर...

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांवर खोके घेतल्याचा आरोप करत टीका केली. वैजापूर तालुक्याचे दिवंगत माजी आमदार आर.एम.वाणी यांचा उल्लेख करत ते असते तर त्यांनी हाता बुट घेवून गद्दारांना (आमदार रमेश बोरनारे) जाब विचारला असता, असे ते म्हणाले. खोके घेतले म्हणून भरपसाठ देणग्या आणि निधी शिंदे सेनेचे गद्दार मंत्री, आमदार देत असल्याचेही दानवे म्हणाले. त्याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वैयक्तिक टीका करत दोन बायका असणाऱ्यांना बुटाने मारले पाहिजे, असा पलटवार केला.

ऐन हिवाळी अधिवेशन काळात अब्दुल सत्तार हे वाशिमच्या गायरान जमीन वाटप आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सवाच्या वसुली प्रकरणामुळे अडचणीत आले होते. अगदी त्यांच्या मंत्रीपदाची मागणी करत महाविकास आघाडीने संपुर्ण दोन आठवडे सत्तारांना घेरले होते. (Marathwada) अर्थात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे (Shivsena) यांनी सभागृहात सत्तार यांच्या एक नाही तर पाच प्रकरणे असल्याचे सांगत त्यांच्या राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी लावून धरली होती.

दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी जंगजंग पछाडले, पण सत्तार यांचा राजीनामा काही सरकारने घेतला नाही. त्यामुळे अंबादास दानवे हे सध्या सत्तारांच्या निशाण्यावर आहेत. वैजापूरच्या कार्यक्रमात खोक्यावरून टीका करतांना बुटाची भाषा केल्याने सत्तार यांनी त्याच भाषेत दानवे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. कृषी महोत्सव सुरू होता तोपर्यंत शांत असलेले सत्तार आता विरोधकांवर तुटून पडण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे पहिले टार्गेट हे अंबादास दानवे असणार आहेत, हेच त्यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेवरून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तारांना बायपास करून भुमरे, दानवे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. तेव्हापासून सत्तार आणि दानवे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. शिवाय बोहरच्या पक्षातून आलेल्या सत्तारांचे शिवसेनेत महत्व वाढू नये, याची काळजी महाविकास आघाडी सरकार असतांना दानवे यांनी घेतली होती. सत्तार हे धुर्त आणि हिशोब चुकता करण्यात पटाईत राजकारणी आहे. संधी मिळेल तेव्हा ते डाव साधतात.

अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांनी सभागृहात सत्तारांच्या कृषी खात्याची आणि त्यांच्यावर झालेल्या गायरान जमीन वाटप प्रकरणाची चांगलीच चिरफाड केली होती. त्यांच्यावर असलेल्या आरोपांची यादीच त्यांनी सभागृहापुढे ठेवली होती. एकंदरित दानवे यांनी सत्ताराच्या राजीनाम्यासाठी लावलेला जोर सत्तार विसरलेले नाहीत. त्यामुळेच सत्तारांनी आता दानवे यांना अंगावर घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

शिंदे बंडानंतर सत्तारांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात त्यांना आव्हान देण्यासाठीच अंबादास दानवे यांनी आपले समर्थक असलेल्या राजेंद्र राठोड यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदीर सोपवत ताकद देण्याचा प्रयत्न केला. याचा राग देखील सत्तार यांच्या मनात आहे. त्यामुळे भविष्यात सत्तार विरुद्ध दानवे असा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT