Imtiaz Jalel Sarkarnama
मराठवाडा

AIMIM News : वंचितसोबत नसल्याचा फरक पडेल, पण शिवसेनेच्या भांडणात मला चान्स..!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Constituency : खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांच्यासोबत या वेळी वंचित बहुजन आघाडी नसल्यामुळे विरोधक त्यांना स्पर्धक मानायला तयार नाहीत. मात्र, वंचित सोबत नसल्याचा फरक पडेल याची कबुली देतानाच शिवसेनेतील भांडणात आपण पुन्हा निवडून येऊ, असा दावा इम्तियाज जलील करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात या वेळीही तिरंगी लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएम आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती. यंदा महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम असा सामना होणार आहे. 2019 च्या एमआयएमच्या विजयाचे कवित्व आता संपले आहे.

वंचित बहुजन आघाडीमुळे इम्तियाज जलील यांना दलितांची एकगठ्ठा मते मिळाली होती हे ते स्वतः जाहीरपणे कबूल करतात. प्रकाश आंबेडकर यांचे हे कर्ज फेडायचे म्हणूनच संभाजीनगर येथील ओवेसींच्या सभेत इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी अकोल्यात वंचितला पाठिंबा जाहीर करण्याची गळ घातली होती. त्यानुसार बडे आणि छोटे भाई अशा दोघांना एमआयएमने पाठिंबा जाहीर केला होता.

महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांनी दोन दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हाच शुभ मुहूर्त म्हणा, की मग अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेल्या विनोद पाटील यांचा धसका घेत महायुतीचे संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज भरला होता. आता उद्या 25 रोजी ते पुन्हा मोठ्या शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, इम्तियाज जलील हे काही वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपल्याबद्दल सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि हलक्यात घेण्याचे विरोधकांचे मनसुबे पाहता ते जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. तत्पूर्वी वंचित सोबत नसल्यामुळे आपल्याला निश्चितच फरक पडणार असल्याची कबुली इम्तियाज यांनी एका मुलाखतीत दिली.

गेल्यावेळी मी वंचितमुळेच खासदार होऊ शकलो, आता ते माझ्यासोबत नाहीत याचा नश्चितच फरक पडणार आहे, हे मी नाकारत नाही. पण म्हणून मी मैदान सोडले, आशा सोडली असे अजिबात नाही.

उलट दोन शिवसेनेच्या (Shivsena) भांडणात मी पुन्हा निवडून येईल. भुमरे आणि खैरे यांच्यातील वाद एवढे विकोपाला गेले आहेत, की त्यांना मी निवडून आलो तरी चालेल, पण ऐकमेकांना पाडायचे आहे, अशी परिस्थिती असल्याचा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. विरोधकांनी निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवावी, मी पाच वर्षांत काय केले हे विचारण्यासाठी समोर या, असे आव्हान इम्तियाज जलील विरोधकांना देत आहेत.

माझ्या खासदारकीच्या काळातील तीन वर्षे कोरोनात गेली, तरी दोन वर्षांत मी मतदारसंघातील प्रश्न, सर्वसामान्यांचा आवाज संसदेत बुलंद केल्याचा दावा ते करतात. तर खैरे वीस वर्षे खासदार होते, त्यांनी जिल्ह्याचा काय विकास केला? असा सवाल एमआयएमकडून केला जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT