Nanded Political News : नांदेड जिल्ह्यात गेली पन्नास वर्ष मी राजकारण करतोय. मला राजकारणातली हवा कळते, त्यानूसार मी सांगतो की पुढच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. एक वडीलधारा व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. समोर बसलेल्या लोकांच्या साक्षीने महाराष्ट्राची कुलस्वामानी तुळजाभवानीला साकडं घालतो की अजितदादा तुम्हाला या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. मला खात्री आहे ही संधी तुम्हाला नक्कीच मिळेल, अशा शुभेच्छा माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी अजित पवारांना दिल्या.
नरसी येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत भास्कर पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मोठी गर्दी जमली होती. यावेळी भास्कर पाटील खतगावकर यांनी माझ्या सूनबाईला तिच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी द्या, अशी सादही घातली. अजित पवार यांना दोन मुले आहेत, तशी माझी सून त्यांची मुलगीच आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याबद्दल खतगावकर यांनी अजित पवारांचे आभार मानले.
आपल्या छोटेखानी भाषणात खतगावकर यांनी राजकीय प्रवास उलगडून सांगितला. (NCP) तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांची यादी सांगत ही कामे पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. प्रताप पाटील चिखलीकर, मी आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून पक्षाला बळकट करू, अशी ग्वाही भास्करपाटील खतगावकर यांनी यावेळी दिली. गेल्या 40-45 वर्षापासून जिल्ह्यात काम करतोय. तीनवेळा आमदार, तीनवेळा तुम्ही मला खासदार केले. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे मी राजकारणात आलो. सुधाकरराव नाईक मंत्रीमंडळात मीही मंत्री होतो.
मला शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी मंत्री केलं होतं, अशी आठवण खतगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितली. तुमचं नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. खंबीर, दिलेला शब्द पाळणार आणि प्रशासनावर वचक असलेला आणि सकाळी सात ते रात्री दहापर्यंत काम करणारा नेता, अशी तुमची ओळख आहे. वयाच्या 31 व्या वर्षी तुम्ही मंत्री झालात, तीस वर्ष तुम्ही मंत्री आहात. अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे, सहावेळा उपमुख्यमंत्री आहात, अशा शब्दात खतगावकर यांनी अजित पवारांचे कौतुक केले.
या भागातील काही विकासाचे प्रश्न आहेत. लेंडी प्रकल्प 80 टक्के पूर्ण झाला आहे, कॅनाॅलचे काम पुर्ण झाले, पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही, म्हणून उर्वरित काम होऊ शकले नाही. तुम्ही लक्ष घातलं तर दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. 45 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. मनार धरण सत्तर वर्षापुर्वी शकंरराव चव्हाण यांनी बांधले. त्याची दुरुस्ती झाली तर 50 हजार एकर क्षेत्राला फायदा होईल. गोदावरी-मनार सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो सुरु करण्यासाठी बैठक बोलवावी.
रस्ते, एमआयडीसीचे प्रश्न आहेत. इसापूर धरणाचे पाणी मिळावे या व इतर मागण्या खतगावकर यांनी यावेळी केल्या. अजित पवारांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी तुळजाभवानीला साकडं घालू, असेही ते म्हणाले. चिखलीकरांनी आमदार झाल्यापासून जिल्हा ढवळून काढला आहे. पन्नास वर्षापासून मी राजकारण करतोयं, मला राजकारणाची हवा कळते. पुढच्या विधानसभेत जिल्ह्यातले पाच आमदार राष्ट्रवादीचे असतील, अशी ग्वाही देतो.
चिखलीकर आणि माझ्यात एकच फरक. ते अॅग्रेसीव्ह आहेत, तर मी यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. त्यांची बरोबरी मी करू शकत नाही, पण त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. सुनेला मी दादांच्या हवाली केले आहे, दादांना दोन मुले आहेत, तशी ही त्यांची मुलगी आहे. त्यांच्या क्षमतेनूसार त्यांना संधी द्या,असेही खतगावकर म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.