Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Paranda Bazar Samiti : महाविकास आघाडीच्या संचालकांच्या अपहरण प्रकरणात अजित पवारांनी लक्ष घातले; संचालक पुन्हा अज्ञातस्थळी

आनंद खर्डेकर

Paranda News : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महाविकास आघाडीच्या संचालकांना मारहाण करून अपहरण करण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील भीमानगर (ता. टेंभुर्णी) येथे घडला. या संचालकांना मारहाण करून सभापती आणि उपसभापती निवडणुकीत ‘आमच्या बाजूने मतदान करा; नाहीतर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. (Ajit Pawar paid attention to the kidnapping case of Mahavikas Aghadi director)

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) सहलीवर गेलेल्या निवनिर्वाचित संचालकांना मारहाण करून पळवून नेल्यानंतर परांडा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मारहाण झालेल्या संचालकांना सोडून देण्यात आले आहे. मात्र, ते संचालक अज्ञातस्थळीच रवाना झाले असल्याचे समजते. महाविकास आघाडीतील बडे नेते घडामोडींवर लक्ष ठेवून असून प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना यात लक्ष घातले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुढे काय वळण मिळते, हे पहावे लागेल.

परंडा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी बुधवारी (ता. २४ मे) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच सकाळी सातलाच महाविकास आघाडीच्या संचालकांना लाकडी दांडक्याने मारहाण करत पळवून नेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारची सभा रद्द करण्यात आली होती. आता तरी सभा उद्या शुक्रवारी (ता. २६ मे) होणार आहे, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीच्या संचालकांना टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे मारहाण करून पळवून घेऊन गेल्याची घटना परांडा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर बाजार समितीच्या समोर दोन गटांत बाचाबाची झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच बळाचा वापर केल्यानेहा वाद वाढला नाही. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे बाजार समितीच्या आवारात तळ ठोकून होते. पण, या घटनेनंतर हे दोन्ही माजी आमदार टेंभुर्णीकडे रवाना झाले आहेत. परंडा शहर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता होती.

दरम्यान, या घटनेबाबत पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आपी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, बाजार समितीत सत्तास्थापन करण्या इतके संचालक आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सभापती आणि उपसभापतीच्या निवडणूकीत लक्ष देण्याचा प्रश्नच नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने १८ पैकी १३ जागेवर विजय मिळवला आहे. स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीकडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT