Ambadas Danve and Eknath Shinde
Ambadas Danve and Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve Vs Mahayuti : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुत्तेदार अन् टक्केवारीसाठी राज्य चालवताय का? ; अंबादास दानवेंचा सवाल!

Jagdish Pansare

Ambadas Danve शासकीय शाळांना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दोन गणवेश देण्याचे ठरविले होते. आज राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत, तरी पुढील दीड महिना सामान्य कुटुंबातील 48 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही.

महायुती सरकारचे हे धोरण अक्षम्य दुर्लक्ष करणारे असून टक्केवारी व गुजराती गुत्तेदारांना पोसणारे असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दीड महिना गणवेश विना राहावे लागणार असून मे महिन्यातच त्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गुत्तेदार आणि टक्केवारीसाठी राज्य चालवत आहे की काय? असा प्रश्नही दानवे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

राज्यभरात आजपासून शाळांची घंटा वाजली आहे.विद्यार्थी उत्साहाने शाळेत निघाले असताना सरकारी गणवेश मात्र त्यांना अजूनही मिळालेले नाही. यासह शेतकऱ्यांचे पीक कर्ज व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेचा भडीमार केला.

राज्यातील बँकामध्ये पीक कर्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांकडे लाच मागितली जात असून त्यांच्या कर्ज मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात बोगस बी- बियाणे यांची विक्री होत आहे, यावर कारवाई होत नाही. सर्व बोगस बी - बियाणे, गुटखा व ड्रग्स गुजरात मधून येत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aaghadi) हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचे स्पष्टपणे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माझा पक्ष भाजपाची बी टीम नाही हे सांगून थकलो असल्याचे स्वीकारले असून, मत खाण्यासाठी ते महाविकास आघाडी विरोधात राजकारण करत असल्याचे जनतेला आता कळले असल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्ष फोडून सर्व गद्दार एकत्र केले.एवढे करूनही फक्त त्यांच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 17 जागा निवडून आल्या. शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा 41 जागा निवडून येत होत्या. जनतेला भाजपाचे राजकारण आवडले नसून अशोक चव्हाण हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. भाजपाने ज्यांच्यावर आरोप केले तेच भाजपचे नेते झाले, यामुळे मतदारांनी त्यांना धडा शिकवला असल्याचे दानवे म्हणाले.

राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी केली तर त्याचे स्वागतच आहे.आक्षेप सर्व अधिसूचनावर येत असतात. त्याचे योग्य पद्धतीने निराकरण शासनाने करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला. आम्ही कोणतेही खोटे नरेटिव्ह सेट केले नाही.

भाजपाचेच मंत्री अनंत्रकुमार हेगडे म्हणाले होते, आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून 400 जागा हव्या आहेत. यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता.ज्यामुळे भाजपाला जनतेने नाकारले असल्याचे सांगत अंबादास दानवे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT