Marathwada Mukti Sangram Day : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या 'मराठवाड्याचा विकास तुम से ना हो पायेगा' हे जनआंदोलन हाती घेण्यात आले आहे. याद्वारे राज्य सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या हजारो कोटींच्या घोषणांची सद्यस्थिती याचा भांडोफोड केला जात आहे.
पक्षाचे राज्यातील नेते या जनआंदोलनात सहभागी झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ सप्टेंबर रोजी हजर राहणार आहेत. एकीकडे हे जनआंदोलन सुरू असतानाच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून एक वेगळीच मागणी केली आहे.
१७ सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम-हैदराबाद लिबरेशन डे या ऐतिहासिक संघर्ष लढ्याची माहिती आजच्या पिढीला कळावी यासाठी हा दिवस राज्यभरात व्यापक स्वरुपात साजरा केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्याचे इतिहासात १७ सप्टेंबर १९४८ या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र प्राप्त झाल्यानंतरही तत्कालीन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले नव्हते. त्यानंतर झालेल्या स्वातंत्र्य संग्रामानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व विचारात घेऊन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने १२ मार्च २०२४ रोजी भारताच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून १७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी 'हैदराबाद लिबरेशन डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांनी केलेला संघर्ष, त्याग व बलिदान हे देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पर्व आहे. या मुक्ती संग्रामाचा इतिहास व त्यामागील राष्ट्रभक्तीची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपणास विनंती आहे की केंद्र शासनाच्या उपरोक्त राजपत्र अधिसूचनेच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन- हैदराबाद मुक्ती दिवस राज्यभर शासकीय स्तरावर व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा.
१७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्याबाबत आवश्यक निर्देश निर्गमित करण्यात यावे. तसेच या दिनानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलीदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे तसेच मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रबोधनात्मक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात यावेत.
ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन १७ सप्टेंबर रोजी राज्यभर राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहणासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन- हैदराबाद मुक्त दिवस शासकीय स्तरावर साजरा करण्याबाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. १७ सप्टेंबर 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात साजरा व्हावा, असेही पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.