Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : राजकारण लयं वंगाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळं सोडून शेती करावीशी वाटते; अंबादास दानवे मनातले बोलले!

Maharashtra politics News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर विधान परिषदेतील आमदार सचिन आहिर यांनी अचानक सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण अत्यंत वेदनादायी आहे. हे चित्र पाहून या चळवळीत काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळं सोडून गावी जाऊन शेती करावी, असे वाटू लागले आहे, अशा शब्दांत आमदार अंबादास दानवे यांनी चालू घडामोडीवर भाष्य केले. राजकारणातील एकमेकांचे विरोधक भेटले की त्यांच्याबद्दल संशय घेतला जातो? राजकारणा पलीकडे अनेकांचे वैयक्तिक संबध असू शकत नाहीत का? असू नये का? उद्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भटले तरी त्याबद्दल आश्चर्य करण्यासारखे काही नसेल, असेही दानवे म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर विधान परिषदेतील आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी अचानक सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. थेट महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाचे उमेदवार म्हणून ते पुढे आले. अंबादास दानवे यांच्या अगदी मागे बसलेले सचिन आहिर आदल्यादिवशी पर्यंत सोबत होते, आम्ही दोघं एकत्र जेवलो आणि सकाळी ते उपसभापती पदाचे महायुतीचे उमेदवार असल्याचे ऐकून धक्का बसल्याचे दानवे यांनी सांगितले.

खासदार, आमदार फुटतात ते काही सहज नाही, त्यांना आमिष दाखवली जातात, त्यामुळे राज ठाकरे जे बोलले ते योग्यच आहे, असे दानवे म्हणाले. प्रत्येकाकडे अगदीच संशयाने पाहणे योग्य नाही. एखाद्या नेत्याने कोणाचे कौतुक केले की लगेच माध्यमांमधून काही तरी वावड्या उठवल्या जातात. आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे कौतुक केले. यामध्ये हरकत घेण्यासारखे काय आहे? एखाद्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचे कौतुक केले म्हणजे ते लगेच त्या पक्षात जाणार? हा जावाई शोध कुठून लावला जातो? राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर फडणवीस चांगलं काम करत असतील तर कौतुक करायला हरकत असायला काही कारण नाही, असे म्हणत त्यांनी समर्थन केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा दौरा नसून रडारड होती, अशी टीका केली होती. यावर श्रीकांत शिंदे किती वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडारड करून गेले ते आम्ही पाहिले आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. सचिन आहिर यांना थेट उपसभापती केल्यामुळे शिंदेसेनेमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांवर ते स्वाभाविक आहे. उपसभापती पदासाठी शिंदेसेनेमध्ये बरेच जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. त्यामुळे अशी नाराजी असणे चुकीचे नाही.

फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ उडाला आहे. राज्यात सध्या गचाळ राजकारण सुरू आहे. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात हा काय प्रकार आहे? खासदार, आमदार खरेदी करणे किती योग्य आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उभे रहा, त्याला निवडून आणा अन् खुशाल स्वतःच्या पक्षात ठेवा काही अडचण नाही? असेही दानवे यांनी सांगीतले. जसं तुम्ही गेलेल्यांना नाव ठेवता, तसं घेणारे कसे घेतात ते काय फुकट घेतात का? ते काय प्रलोभन देतात, याचाही विचार केला पाहिजे.

राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती वेदनादायी आहे. पक्षातले चार लोक गेले म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही पक्षही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चार लोक गेले तर चार लोक येत असतात कोणताही पक्ष असो. अशा पद्धतीने जे राजकारण सुरू आहे ते वेदनादायी आहे. त्यामुळे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अस वाटते हे सगळं सोडून द्यावं आणि गावाकडे जाऊन आपली शेती करावी.

बँकेच्या निवडणूकीत पक्ष, चिन्ह नसते..

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवत आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असले तरी अंबादास दानवे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानूसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडूक ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वात किंवा पक्षाच्या नावाने लढवली जात नाही. ही काही पक्षाची निवडणूक नाही.

उद्या ग्रामपंचायतला सगळेजण पॅनल उभे करतात. सहकाराच्या निवडणुका तुम्हाला माहित आहेत का? मुंबईत प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे चेअरमन आहेत. त्याच बँकेत आमचे आमदार सुनील राऊत हे संचालक आहेत. सहकारात कोणत्याच पक्षाची ताकद नसते जनतेसाठी सहकार असतो, जनतेसाठी एकत्र येण्याची भूमिका ठेवावी लागते. हे सगळं करून पक्षाचे जोडे सहकार क्षेत्राच्या बाहेर ठेवावे लागतात, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT