Amit Deshmukh-Baswaraj Patil News, Latur
Amit Deshmukh-Baswaraj Patil News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh News : राज्यात तीन पक्ष एकत्र येवू शकतात, मग इथे का नाही ? अमित देशमुख गटबाजीला वैतागले..

सरकारनामा ब्युरो

Latur News : जिल्ह्यातील काॅंग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीमुळे माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) चांगलेच वैतागले. औसा येथील सत्कार सोहळ्याकडे बसवराज पाटील समर्थकांनी पाठ फिरवल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीवर अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले. राज्यात तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतोय. मग औसा येथे पक्षात दुफळी का ? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

काँग्रेस (Congress) पक्षाचा शत्रू हा विरोधी पक्ष नसतो तर तो स्वकियच असतो असे काँग्रेस पक्षाबद्दल नेहमी बोलले जात होते. देश पातळी पासून राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर हे दिसून येते. (Latur) अमित देशमुख गटाच्या कार्यक्रमाला बसवराज पाटील मुरूमकर गटाचे कार्यकर्ते गैरहजर राहिले. यावर अमित देशमुख जाहीर सभेतच बोलले.

राज्यपातळीवर तीन पक्षाचे नेते एकत्र येऊ शकतात, सत्ता स्थापन करू शकतात तर औसा विधानसभा मतदारसंघातील तीन काँग्रेस नेते एकत्र का येऊ शकत नाही ?असा प्रश्न करत अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजीच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

श्रीशैल उटगे हे देशमुख गटाचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे माजी आमदार बसवराज पाटील याचे समर्थक या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यात युवक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, संगमेश्वर ठेसे, माजी तालुका अध्यक्ष शेषेराव पाटील यांच्यासह अनेक आजी माजी पदाधकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची गटबाजी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

दोन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा गट इथे कायमच सक्रिय राहिलेला आहे. त्यांच्या विरोधात अमित देशमुख गटाचे कार्यकर्तेही जोमाने काम करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांना देशमुख गटाने बळ देत बसवराज पाटील यांचा पराभव केला असा आरोप त्यांच्या गटाकडून केला जातो. याबाबत दोन्ही गटांचे समर्थक बऱ्याचदा आमने-सामने आले आहेत.

हा संघर्ष स्थानिक पातळीपर्यंतच मर्यादित होता. मोठ्या नेत्यांसमोर हा संघर्ष कधीही उफाळून समोर आला नाही किंवा नेत्यांनी तो येवू दिला नव्हता. मात्र या कार्यक्रमात हा संघर्ष दिसून आला. अमित देशमुख यांनी त्यावर भाष्य करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. अमित देशमुख म्हणाले, राज्यपातळीवर तीन वेगवेगळे पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करू शकतात. मात्र एकाच विधानसभा मतदारसंघातील एकाच पक्षाचे कार्यकर्ते, त्यांच्यातील गटबाजी चर्चेचा विषय ठरते.

लोकांच्या लक्षात हे सगळे येते, हे योग्य नाही. अगोदर भेटण्यास एकत्र येत होते मात्र आता वेगवेगळे येत आहेत हे सर्व लोक पहात असतात, त्यामुळे गटबाजी संपवा आणि एकदिलाने काम करा, असे आवाहन देखील अमित देशमुख यांनी केले. राज्यात पाच वर्षात दोन सरकार आले आहे, पण सरपंचांचे बरे आहे एकदा सत्ता आली की पाच वर्ष बेफिक्री, असा चिमटा देखील देशमुखांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT