Shivsena-Bjp Alliance News : अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नांदेड-वाघाळा महापालिकेची सत्ता एकहाती आपल्याकडे ठेवली होती. 81 पैकी तब्बल 73 नगरसेवक निवडून आणत विरोधकांचा सुपडासाफ झाला होता. भाजपला 6 तर अखंड शिवसेनेने कशीबशी एक जागा जिंकत खाते उघडले होते. तर एका अपक्षानेही विजय मिळवला होता.
2017 मधील हे चित्र असताना राज्यातील बदलते राजकारण, अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट यामुळे नांदेडमधील चित्र बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाल्यानंतर विधानसभेत मात्र महायुतीने महाविकास आघाडीला व्हाईट वाॅश दिला होता. शिवसेनेचे जिल्ह्यात सध्या तीन आमदार आहेत. या जोरावर शिवसेनेने म्हणजे पक्षाचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांनी युतीसाठी अशोक चव्हाण यांच्याकडे पन्नास टक्के जागांची मागणी केली आहे.
2017 मध्ये शिवसेना एकसंध असताना महापालिकेत या पक्षाचा एक नगरसेवक होता. तीच शिवसेना पक्ष फुटल्यानंतर निम्म्या जागा युतीत मागत आहेत. अवास्तव मागण्या करत अशोक चव्हाण यांच्यावर युती तोडल्याचे खापर फोडण्याचा हेमंत पाटील यांचा डाव असल्याचे बोलले जाते. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे भाजपसोबत युती करण्यास इच्छूक असताना हेमंत पाटील यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे.
अशोक चव्हाण कुठल्याही परिस्थिती शिवसेनेशी युती करणार नाही, याचा अंदाज पाटील यांना आला आहे. त्यामुळे पन्नास टक्के जागांची मागणी करत युतीची चर्चा पुढे जाऊच नये, आणि त्याला अशोक चव्हाण हेच जबाबदार आहेत, असे सांगत राष्ट्रवादीशी युती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. युतीच्या चर्चेची एकच फेरी झाली, अद्याप भाजपने आपला प्रस्तावही शिवसेनेला दिला नाही. असे असताना हेमंत पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीशी युतीची तयारी करत प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेत चर्चा केली.
उपनेते आणि हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही युतीचे सर्वाधिकार हेमंत पाटील यांनाच दिल्याचे समजते. त्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर यांच्या इच्छेला फारसे महत्व उरत नाही. अशोक चव्हाण यांच्याशी हेमंत पाटील यांचे नांदेड जिल्ह्यात कायम खटके उडत आले आहेत. पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कायम नांदेडच्या दुरावस्थेला तेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
नांदेड जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व राखलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावरही त्यासाठीच प्रयत्नशील राहणार आहेत. नांदेडमध्ये ते भाजपच्या इतर कोणत्याही नेत्याला लुडबूड करू देणार नाहीत. शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवून अखेरच्या क्षणी ते जागा वाटपावरून युती तोडतील, त्यापेक्षा आधाची राष्ट्रवादीला (NCP) जवळ करत हेमंत पाटील यांनी प्लॅन 'बी' ची आखणी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून जुळवून घ्या, युती करा असे आदेश आल्यामुळे दोन्ही बाजूंनी आम्ही युतीसाठी प्रयत्न करतोय, असे चित्र निर्माण केले जात आहे.
मनापासून मात्र महायुतीतील एकाही पक्षाला एकमेकांशी युतीत लढण्याची अजिबात इच्छा नाही. परिणामी नांदेडमध्ये युती तुटल्यात जमा आहे. मुस्लिम मतं भाजपकडे वळणार नाहीत, ती काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिंदेच्या शिवसेनेकडे, महाविकास आघाडीकडे वळू नये, यासाठी अशोक चव्हाण स्थानिक आघाडीचा घाट घालू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक चव्हाण यांचे राजकारण हेमंत पाटील यांनी जवळून पाहिले आहे, त्यामुळे त्यांच्याशी युती करून नुकसान करून घेण्यापेक्षा राष्ट्रवादीसोबत जाऊन काही हाती लागते का? असा प्रयत्न हेमंत पाटील करताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.