Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पत्र प्रभू श्रीरामांना, शालजोडीतून भाजपला

Jagdish Pansare

Chhtrapati Sambhajinagar News :

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने झाला आहबे. सर्वांनी आनंदाचा हा क्षण डोळ्यात साठवला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राज्यातील शिवसेना ठाकरे गट विरुद्ध महायुती तर देशपातळीवर 'इंडिया' आघाडी आणि भाजप असा संघर्ष सुरू आहे.

भाजपने (BJP) रामाच्या नावावर राजकारण सुरू केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर इकडे महाराष्ट्रात ठाकरे गटाचे नेतेही भाजपवर तुटून पडले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आजच थेट प्रभू श्रीरामचंद्रांना पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्रात नेमके काय म्हटले आहे, कुणावर निशाणा साधला आहे ते पत्रच जसे आहे तसे देत आहोत...

प्रति,

अयोध्यापती प्रभू श्री. रामचंद्र, आज सोन्याचा दिवस आहे. प्रत्येक हृदयात वास करणारे आपण आज आपल्या घरात प्रवेश करत आहात. आपला देश या प्रवेशाची वाट पाहत होता. ही वाट काही कालपरवापासून पाहिली गेली नाही. साधारण 500 वर्षांपासून हा घोर मनाला लागून होता, ज्याला आज पूर्णविराम मिळतो आहे. आपल्यासाठी लढे देणारे लोक, अगदी 1885 साली पहिला खटला दाखल करणारे महंत रघुवरदास, 16 जानेवारी 1950 पासून न्यायालयीन लढाई लढणारे ठाकूर गोपालसिंह विशारद, रामचंद्र परमहंस ते प्राण देणारे कोलकात्याच्या कोठारी बंधू आणि असंख्य रामभक्त आठवतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्यांनी राम जन्मभूमी आंदोलनाची ज्योत आपल्या प्राणाची आहुती देऊन तेवत ठेवली. 30 सप्टेंबर 2020 रोजी बाबरी प्रकरणाचा निवाडा विशेष न्यायालयाने केला. हा निकाल हाती येईपर्यंत ज्यांच्यावर खटला चालला अशा 49 जणांपैकी 17 जणांना देवाज्ञा झाली होती.

यात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तेजोमय नावही होते. या उर्वरित 32 जण ज्यांच्यावर खटला चालला त्यात प्रामुख्याने नावे घेता येतील त्या उमा भारती, मुरली मनोहर जोशी होते. शिवाय विनय कटीयार, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया आदी नावे आजही आहेत.

पण कुठे आहेत, हा सवाल आज खऱ्या राम भक्तांना पडल्याशिवाय राहत नाही. आपल्या अयोध्येतील घरापासून साधारण 800 किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर उभे असल्याचे फोटो दाखवण्याचा आटापिटा करणारे लोक आपणच सर्वात मोठे रामभक्त असल्याचे दाखले देत फिरत आहेत. बाकी आपल्या या आजच्या सोहळ्याला बॉलिवूडसह उद्योग, खेळ जगतात ज्यांना मोठा 'फॉलोअर' वर्ग आहे, असे हजारो लोक आज आपल्या दरबारापुढे हजर आहेतच. याचीही नोंद आपण घ्यालच, यात तिळमात्र शंका नाही.

जय श्री राम!.

अंबादास दानवे यांनी स्वतःचा रामभक्त असा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. आता त्यांच्या पत्राला भाजप उत्तर देणार काय, हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT