Maharashtra Congress Vs BJP : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपचे खासदार आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चव्हाण यांनी राहुल गांधींना उद्देशून केलेल्या ‘पळू नका, लपून बसू नका; चर्चेला सामोरे जा, सत्याला सामोरे जा’ या टीकेवर सपकाळ यांनी त्यांच्याच शैलीत पलटवार केला.
सपकाळ यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधताना, “काळे-पांढरे धंदे लपवण्यासाठी पळून गेलेल्यांनी संघर्ष करणाऱ्यांना ‘Face the Debate’ सांगण्यापेक्षा आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा,” असा टोला लगावला. तसेच, “आपल्या कर्तृत्ववान आणि तत्त्वनिष्ठ वडिलांचा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो समोर ठेवून ‘Face the Fact’ करावा,” असेही त्यांनी म्हटले.
सपकाळ यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस (Congress) आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः राहुल गांधी यांच्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील कथित मारहाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात अमित शाह संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचे सत्ताधारी भाजपकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यात अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींना थेट आव्हान दिले. “पळू नका, लपून बसू नका. चर्चेला सामोरे जा, सत्याला सामोरे जा,” अशा आशयाची पोस्ट चव्हाण यांनी केली. त्यांच्या या पोस्टनंतर महाराष्ट्र काँग्रेसनेही सोशल मीडियावरून त्यांना प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र काँग्रेसने चव्हाण यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्यावरून भाजपवरच प्रश्न उपस्थित केले. “तुमचे दिल्लीतले ‘कुचू आणि पुचू’ एवढे दिवस त्याच राहुल गांधींना घाबरून संसदेत येत नव्हते. आता संसदेत येऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असा टोला काँग्रेसने लगावला. तसेच, “खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गन्स चालवण्याचे आदेश कोणी दिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याची माहिती नव्हती का?” असा सवालही काँग्रेसने केला.
यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत हा राजकीय वाद आणखी तीव्र केला आहे. राहुल गांधींवरील चव्हाण यांच्या टीकेला काँग्रेसकडून सातत्याने प्रत्युत्तर मिळत असल्याने दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष अधिक धारदार होताना दिसत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या पलटवारामुळे आगामी काळात काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.