Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar
Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics : काँग्रेस-भाजपात जुंपली; 'महामार्ग परिक्रमे'नं लातूरचं वातावरण तापलं

राम काळगे

Nilanga Political News : राज्यातील रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप करत लातूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. अटल सेतू महामार्गाला गेलेले तडे दाखवत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर बोट ठेवले होते. याचे लोन आता जिल्हा आणि तालुका पातळीवर पोचल्याचे दिसत आहे.

माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर Sambhaji Patil Nilangekar आमदार असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या लातूर-झहिराबाद महामार्गावर खड्डे पडून झालेल्या अपघातात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. याचा निषेध म्हणून काँग्रेसने महामार्ग परिक्रमा यात्रा काढून भाजपला डिवचले. त्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख व त्यांच्या समर्थकांवर आरोप करत पलटवार केला.

महामार्ग परिक्रमा काढून काँग्रेस राजकीय पोळी भाजू पाहत आहे. भाजपला विनाकारण बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. याच महामार्गाचे काम चालू असताना कोणी अडवले? विकासकामात कोणी खोडा घातला? हे जनतेला माहिती आहे, अशा शब्दांत भाजपच्या नेत्यांनी अमित देशमुख Amit Deshmukh यांच्यावर हल्ला चढवला.

निलंगा मतदारसंघातील राजकीय वातावरण गढूळ करण्याचा लातूरच्या देशमुखांचा हा खटाटोप असून अशा नौटंकीतून काहीच साध्य होणार नाही, अशी टीका भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री संजय दोरवे यांनी केली.

निलंगा मतदारसंघात काँग्रेसकडून महामार्ग परिक्रमा काढली जात आहे. महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याने अपघात होत आहेत. यास सर्वस्वी भाजपाचे लोकप्रतिनीधी व बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्या दुर्लक्षाने काम निकृष्ट झाले असून अनेकाचे बळी गेले, अनेकांना अपंगत्व आले असा काँग्रेसचा आरोप आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीने महामार्ग परिक्रमा काढली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

राजकीय स्वार्थासाठी रस्त्यातील खड्याचे राजकारण काँग्रेसकडून केले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अतिशय दूरदृष्टीने निलंगा विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले. महामार्गाच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे हा हेतू रस्ते विकासाच्या बाबतीत त्यांचा होता. म्हणूनच संपूर्ण लातूर जिल्ह्यात महामार्गाचे जाळे तयार झाले झाले आहे.

महामार्ग तयार होऊन जवळपास चार वर्षाचा काळ उलटला आहे. त्याच रस्त्यावर काही ठिकाणी काही प्रमाणात खड्डे, भेगा पडल्या आहेत हे सत्य आम्ही नाकारत नाही. ते बुजवण्याच्या सूचना संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

असे असताना लातूरच्या देशमुखांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राजकीय स्वार्थ उराशी बाळगून संबंधित रस्त्यावरील खड्ड्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर कुठल्याही विकासाच्या कामात सर्वच पक्षाने मदत करणे अपेक्षित असताना या कामाचे राजकीय भांडवल करून आपली पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सरू आहे, असा आरोप दोरवे यांनी केला.

या पुढच्या काळात अशा प्रकारची नौटंकी करून राजकारण करण्याचा देशमुख काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला तर तो आम्ही हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी सभापती संजय दोरवे यांनी दिला. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी रस्ते अडवले होते. तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी मतदार संघाला कवडी एवढा तरी निधी दिला का? असा प्रति सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT