Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : फडणवीसांनी जरांगेंच्या पदयात्रेसाठी पोलिसांना 'अलर्ट' केले, तब्बल 1100 पोलिस अन् 100 अधिकारी नेमले

Deepak Kulkarni

Jalna News : मनोज जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्रासाठी शिंदे - फडणवीस- पवार सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला त्याचवेळी त्यांनी 20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेची घोषणा केली होती. यानंतरही सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आता जरांगे पाटलांची पदयात्रा शनिवारी (ता.20)अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना होणार आहे. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना अलर्ट केले असून तब्बल 1100 पोलिस कर्मचारी आणि 100 पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोठा लढा उभारला आहे.कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही असा ठाम पवित्रा घेत त्यांनी सरकारविरोधात मराठा समाजाची एकजूट बांधली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी आता अंतरवाली सराटीहून मुंबईकडे पदयात्रा काढली आहे. तसेच आरक्षणासाठी मराठा बांधवांना मुंबईला येण्याचे आवाहन केले आहे.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आता गावागावांतून मराठा समाज मुंबईकडे येण्यासाठी तयार झाला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai) हे जवळपास 405 किलोमीटरचे अंतर आहे. जरांगे पाटलांच्या पदयात्रेचा हा सात दिवसांचा टप्पा आहे. या पदयात्रेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.1100 पोलिस कर्मचारी आणि 100 पोलिस अधिकारी तैनात असून एसआरपीएफची एक कंपनी, रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी सोबत असणार आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

पदयात्रा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे बरोबरच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर असणार आहे.सामान्य नागरिकांना अडचण होणार नाही या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. मराठा आयोजकांसोबत बैठका झालेल्या आहेत. या पदयात्रेसाठी आचारसंहिता करायची सांगितलेली आहे. पदयात्रेत सहभागी असणाऱ्या नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे याची खबरदारी देखील घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नोंदी सापडलेल्या पात्र लोकांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकार दीड महिना झोपले होते का ? आता आम्हाला वेड्यात काढता का, असे प्रश्न उपस्थित करत जरांगेंनी सरकार आणि प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील 54 लाख मराठा लोकांना प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मात्र सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाकडे दीड महिन्याचा कालावधी होता. या काळात लोकांनी अर्जही दाखल केले. मात्र त्यांना अद्यापही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही. आमच्यावर हल्ला करणारे हेच लोक होते, आता अडवणूक करतात, असा आरोपही जरांगेंनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT