Atul Save  Devendra Fadnavis
Atul Save Devendra Fadnavis sarkarnama
मराठवाडा

Atul Save : अतुल सावेंना पालकमंत्री करणार? फडणवीसांचे दोनच शब्दांत उत्तर, म्हणाले...

Jagdish Pansare

Atul Save News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे संदिपान भुमरे तब्बल एक लाख 35 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. भुमरे यांच्या विजयामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असून त्यांना निवडून आणल्याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री पद भाजपचे अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती.

या संदर्भात शुक्रवारी (ता.13) मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यात शिवसेनेचे संदिपान भुमरे हे भाजपमुळे विजयी झाले असा दावा करतानाच संभाजीनगरचे पालकमंत्री पद अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर व इतरांनी निवेदनाद्वारे केली. यावर 'विचार करू', अशा दोनच शब्दात फडणवीसांनी उत्तर दिले.

भाजपच्या BJP या मागणीमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदिपान भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांना आमदारकीचा आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा येत्या काही दिवसांत द्यावा लागणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 21 तारखेपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेनेकडे असल्यामुळे साहजिकच या पदावर पहिला दावा त्यांचा असणार आहे.

परंतु शिवसेनेकडून मंत्री आणि पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat यांना आधी मंत्रिमंडळात मंत्री व्हावे लागेल. त्यानंतरच त्यांना पालकमंत्री करता येईल, मात्र सध्या तरी राज्य पातळीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपने संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा करत नवी खेळी खेळली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून पालकमंत्री पदावर स्थानिक नेते दावा करत होते. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मात्र या विषयावर शिवसेनेकडून मात्र अद्याप कुठलीच प्रतिक्रिया उमटलेली नाही. संभाजीनगरातून फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला पालकमंत्री पदाच्या मागणीवर विचार करू असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर सध्या जालन्याचे पालकमंत्री असलेल्या अतुल सावे यांच्याकडे संभाजीनगर जिल्ह्याचा पदभार सोपवला जाऊ शकतो. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्यातलेच असल्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात. परंतु संजय शिरसाट यांचा सत्तार यांना तीव्र विरोध होऊ शकतो. शिवाय महायुतीमध्ये सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे काम केले नाही, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

अशावेळी भाजपनेत्यांकडूनही सत्तारांच्या नावाला विरोध केला जाऊ शकतो. अशावेळी अतुल सावे हाच एकमेव पर्याय सध्यातरी समोर दिसत आहे. अतुल सावे यांनीही आपल्याला जिल्ह्यात काम करायला नक्कीच आवडेल, असे म्हणत पालकमंत्री होण्यात रस दाखवला आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT