Beed News : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी योजनेला मंजूरी दिली आहे. त्याचा आराखडा तयार केला जात असून तो लवकरच तयार होईल. 53 टीएमसी पाणी या योजनेतून गोदावरी खोऱ्यात आणण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मागच्या पिढीने दुष्काळ पाहीला असला तरी नव्या पिढीला तो पहावा लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाड्याती संतांच्या आशीर्वादाने आपण लवकरच ही योजना पूर्ण करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
बीड (Beed News) जिल्ह्यात घटशीळ पारगाव येथील गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नारळी सप्ताह सांगता समारंभाला मुख्यमंत्री हजर होते. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह या सोहळ्या उपस्थित राहून त्यांनी बीड जिल्हा आणि मराठवाड्याती दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. आमचा बीड जिल्हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळात आपल्या हक्काचं कृष्णेचं पाणी आष्टी पर्यंत पोहोचण्याचा निर्णय केला. ते पाणी आज आष्टीपर्यंत पोहोचले आहे.
पण हे पाणी केवळ आष्टी पर्यंतच मर्यादित न ठेवता ते पुढे देखील आणून आख्या जिल्ह्याला पाणीदार करायचा आहे आणि तोच आमचा प्रण असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे वर्णन करताना फडणवीस यांनी एक उदाहरण दिले. एका हौदामध्ये पाणी आहे आणि ते मागणारे अनेक जण. हौदातलं पाणी वाढत नाहीये, तर मागणाऱ्यांचे हात मात्र वाढत आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठीच आपण मराठवाड्यातील संतांच्या आशीर्वादाने समुद्राकडे वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठीच्या योजनेला मान्यता दिली आहे.
यातून 53 टीएमसी पाणी आपल्याला मिळणार आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल. कृष्णा वहिनीला जो पूर येतो त्या पुराचे पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या भागात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. सोबतच येत्या मे महिन्यात आम्ही त्याचे टेंडर देखील काढणार आहोत. त्यामुळे मराठावड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ बघितला, मात्र पुढील पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
गडाने मला दत्तक घ्यावे..
नारळी सप्ताह सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्हा सातत्याने भक्तीच्या रसात न्हाऊन निघतो, असे गौरवोद्दगार काढले. बीड जिल्ह्यात सप्ताहाची फार मोठी परंपरा आहे. 93 वर्ष नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यात होतोयं, याचे मोठे समाधान आहे. अनेक अडचणींचा सामना करत ही भक्तीची परंपरा या जिल्ह्याने कायम राखली आहे. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली. या बीड जिल्ह्याशी माझं वेगळं नातं झालं आहे.
गहिनीनाथ गडावर येण्याची संधी मला मिळाली. याच भागात विकासाचे कार्य पंकजा ताईंनी हातात घेतले. इथे बोलताना पंकजा ताईनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितले की, मी गड दत्तक घ्यावा. मात्र गड ताब्यात घ्यायची माजी ऐपत नाही, औकातही नाही. मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे. मात्र तुम्ही मला दत्तक घ्या, असे मुख्यमंत्री नम्रपणे म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.