CM Devendra Fadnavis On Marathwada Devlopment News Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis : घोषणांचा पाऊस म्हणत हिणवणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांची यादीच दिली!

CM Devendra Fadnavis In Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात सुरू असलेली विकास कामे सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर..

Jagdish Pansare

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा विकासविरोधी आरोप करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

  2. संभाजीनगर येथे विकासकामांची सविस्तर यादी वाचून फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

  3. मराठवाड्यातील प्रगती व प्रकल्पांची माहिती देऊन विरोधकांचा आरोप खोडून काढला.

Marathwada Political News : मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात अंमलबजावणीचा दुष्काळ असे म्हणत महायुती सरकारला हिणवणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले. मराठवाड्याच्या विकासकामांबद्दल बोलायला गेलो तर वेळ पुरणार नाही, पण काही गोष्टी सांगाव्याच लागतील, असा टोला लगावत झालेल्या कामांची यादीच आपल्या भाषणात वाचून दाखवली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) होणारी मंत्रिमंडळ बैठक यंदा झाली नाही. याशिवाय विकासकामांचे प्रस्ताव देखील जिल्ह्यातून मागवण्यात आले नाही, अशी टीका करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. आतापर्यंत साठ हजार कोटींच्या घोषणा मराठवाड्यासाठी केल्या प्रत्यक्षात निधी मात्र 9 हजार कोटीच मिळाला. या गतीने मराठवाड्याचा विकास कसा साधणार? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केला होता.

या सगळ्या आरोप, टीकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार या त्यांच्या घोषणेची खिल्ली उडवली गेल्या, त्यावर मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ करणारच असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचाच नव्हे तर हा एक संघ भारत निर्मितीचा दिवस आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे मराठवाड्यात नैसर्गिक आपत्ती ओढावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे, पिकाचे नुकसान झाले. या आपत्तीत काही जणांचे प्राणही गेले.

नुकसान झालेल्या सर्वांना तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्ती सोबतच दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजला आहे. दुष्काळ हटवण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यापर्यंत आणले आहे. दुसऱ्या टप्प्यात सांगली, कोल्हापुरातल्या पुराचे पाणी उजनीपर्यंत मराठवाड्यात आणले जाईल. त्यानंतर उल्हास खोऱ्यातला 54 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाईल. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट दूर करणार. त्यासाठीच्या विविध कामांना येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष सुरुवात होईल. दोन वर्षात सात प्रकल्पांची गळभरणी केली. त्यामुळे 38.48 दलघमी पाणीसाठा निर्माण केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी करून दिली.

काहींना शंका... पण काम करत राहू

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 ला मराठवाड्यात बैठक घेतली. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत, त्याचे काय झाले याविषयी काहींना शंका आहे. त्यावेळी झालेल्या निर्णयाचे काय झाले याविषयी सांगत बसलो तर वेळ लागेल. परंतु काही कामाचा उल्लेख करावाच लागेल. घृष्णेश्वर, तुळजापूर, औंढा नागनाथ विकास आराखडा, मानव विकास मिशन अंतर्गत दिलेल्या 94 बस, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दिलेल्या 115 बस, 916 अंगणवाड्या, 26 हजार 500 बचत गट तयार करून त्यामाध्यमातून 2 लाख 70 हजार महिला जोडणे, 3121 कोटीच्या रस्त्यांची सुरू केलेली कामे, 4 लाख पैकी 30 हजार सिंचन विहिरींची केलेलीं निर्मिती झाली आहे.

तसेच शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दिलेले 2700 कोटी, मंनपाचाही भरलेला हिस्सा, हुंडाईची झालेली गुंतवणूक, लातूर येथे अंतीम टप्प्यात असलेली कोच फॅक्टरी निर्मितीमुळे निर्माण होणारे रोजगार, अहिल्यानगर- बीड रेल्वेची होत असलेली सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनते आहे. त्यामूळे झालेली बैठक आणि त्यातील निर्णय औपचारिकता नव्हती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुणाला शंका असल्या तरी महायुती सरकार मराठवाड्याच्या प्रगतीसाठी काम करीत राहील, अशी ग्वाही, फडणवीस यांनी यावेळी दिली.

भाषणावेळी घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाला सुरुवात करताच ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने काहींनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी लागेच त्यांना त्या ठिकाणावरून नेले. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी अशा घटना घडत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. काही लोकं प्रसिद्धीसाठी असे करतात असेही फडणवीस म्हणाले.

FAQ

प्र.1. विरोधकांनी कोणता आरोप केला होता?
विरोधकांनी मराठवाड्यात विकास झाला नाही असा आरोप केला होता.

प्र.2. फडणवीसांनी काय उत्तर दिले?
फडणवीसांनी संभाजीनगर येथे विकासकामांची यादी वाचून प्रत्युत्तर दिले.

प्र.3. या विकासकामांत कोणते प्रकल्प आहेत?
पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

प्र.4. हा वाद कुठे उफाळला?
छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात हा वाद रंगला.

प्र.5. फडणवीसांच्या भाषणाचा मुख्य संदेश काय होता?
मराठवाड्यात सातत्याने विकास सुरू असून विरोधकांचे आरोप निराधार आहेत हा संदेश त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT