News Arena India Survey Sarkarnama
मराठवाडा

News Arena India Survey : फडणवीसांचे 'खास' अभिमन्यू पवारांसह शिंदे गटाचे भुमरे आणि बांगर अडचणीत...

सरकारनामा ब्यूरो

Marathwada : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. याचवेळी वेगवेगळ्या संस्थांचे सर्व्हे देखील समोर येत आहेत. आता न्यूज एरेना इंडिया या संस्थेनं केलेल्या सर्व्हेत धक्कादायक अंदाज पुढे आले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा भाजप शिवसेनेचंच सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठवाड्यात युती आणि आघाडीत 'काँटे की टक्कर' होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या सर्व्हेनं युतीतील काही नेत्यांची धाकधूक वाढवली आहे.

‘न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्यातील काही जागांवर भाजपला तर काही जागांवर शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे. यात औसाचे भाजप आमदार व देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभिमन्यू पवार यांची जागा धोक्यात असल्याचा सर्व्हेत समोर आलं आहे. या जागेवर काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लातूर -कुटुंबातील रा. स्व. संघाच्या वातावरणामुळे लहानपणापासूनच शाखेत जाण्यास सुरुवात करणारे, महाविद्यालयीन शिक्षणाच्या भाजपशी जोडले गेलेले अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. अनेक प्रकारच्या पक्षातील जबाबदाऱ्या स्वीकारत त्यांनी औसा मतदारसंघ बांधला आणि ते औसा मतदारसंघातून विजयी झाले.

भुमरे अडचणीत...

दुसरीकडे पैठणचे शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' असलेले संदिपान भुमरे(Sandipan Bhumare) त्याच कारखान्याचे चेअरमन झाले. पाच वेळा निवडून येत त्यांनी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळविले आहे. १९८८ मध्ये पाचोड येथे शिवसेनेची शाखा स्थापन करत संदिपान भुमरे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतील बंडात त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंना साथ दिली.

आमदार बांगर 'डेन्जर झोन'मध्ये...

संतोष बांगर(Santosh Bangar) हे शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक शिवसेनेसोबत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी विधिमंडळात शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला मतदान केलं होतं. मात्र, बहुमत चाचणी सिद्ध करत असताना त्यांनी अचानकपणे शिंदे गटाला मतदान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हापासून ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यं आणि आक्रमक स्टाईलमुळे चर्चेत असतात. पण आता 'न्यूज एरेना इंडिया'च्या सर्व्हेनं बांगरांचं टेन्शन वाढवलं आहे. कारण हिंगोला जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसला जनतेनं कौल दिल्याचं समोर आलं आहे.

कन्नडमध्ये 'बीआरएस'ला कौल...

कन्नड विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन रायभान जाधव यांचा विजय झाला. त्यांनंतर २०१४ साली देखील ते पुन्हा निवडून आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधन यांनी राजीनामा दिला.

यानंतर २०१९ ला तिथे ठाकरे गटाचे उदयसिंह सरदारसिंह राजपूत आमदार म्हणून निवडून आले आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत ही जागा राज्यात नव्यानं एन्ट्री घेतलेल्या बीआरएसला मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी हर्षवर्धन जाधव निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांपैकी केलेल्या सर्व्हेत भाजपला सर्वाधिक १२३ ते १२९ तर शिंदे गटाला २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणं अपेक्षित आहे. ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात ४६ जागांपैकी भाजपला १९ जागा, शिवसेना (शिंदे गट) ५, ठाकरे गट २, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ९ आणि इतर एक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT