NCP Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : धाराशिवमध्ये मोठा घोळ! राष्ट्रवादीच्या AB फॉर्मवर चुकीची स्वाक्षरी; अजित पवारांचा उमेदवार अपक्ष रिंगणात!

NCP internal split News : धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत मोठा घोळ झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत मोठा घोळ झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. धाराशिव तालुक्यातील पंचायत समितीवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, मधल्या काळात याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत पंचायत समितीच्या 24 गणापैकी एकाही गणात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यातच आता AB फॉर्मवर चुकीची स्वाक्षरी केली असल्याने पंचायत समितीच्या जागजी गणातील अजित पवार पक्षाच्या उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागले आहे.

धाराशिव तालुक्यातील जागजी पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार या पक्षाकडून येथील इच्छुक असलेले उमेदवार धीरज रावसाहेब घुटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी (21 जानेवारी) एबी फॉर्म दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पक्षाकडून मिळाला. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज व एबीफॉर्म घेऊन भरण्यासाठी कार्यालयात दुपारी पावणे तीनच्या सुमारास गेले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांच्या समोर गेल्यानंतर त्यांना ए फॉर्मवर आनंद परांजपे यांची सही आहे, B फॉर्मवर शिवाजीराव गर्जे यांची सही आहे. या दोन्ही फॉर्मवर आनंद परांजपे यांची सही पाहिजे, असे सांगण्यात आले.

त्यामुळे अचानक त्यांची धावपळ झाली. विशेष म्हणजे या फार्मवरच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयाची स्वाक्षरी करण्याची जबाबदारी आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांच्याकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे असतानाही त्या B फॉर्मवर शिवाजीराव गर्जे यांची सही होती. यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचा एबीफॉर्म बाद झाला. त्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवावी लागली आहे.

शेवटच्या 15 मिनिटांत हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या पक्षातील नेते माजी खासदार आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे व धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना फोन करून या सर्व प्रकारची माहिती दिली. त्यानंतर तिघा जणांनी ही त्यांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र, त्यावर आता या प्रकारामुळे पाणी फेरले आहे. पक्षातील या नेतेतमंडळींकडून त्यांना आता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता ऐनवेळी त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

त्यातच दुसरीकडे मात्र, धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गटातील उमेदवार व पक्षाचे जिल्हध्यक्ष महेंद्र धुरगुडे व कळंब तालुक्यातील मोहा गणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवाराने भरलेला एबी फॉर्मवर मात्र आनंद परांजपे यांची स्वाक्षरी असल्याने हा फॉर्म मात्र बाद झाला नाही. केवळ जागजी गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार धीरज घुटे यांना चुकीच्या स्वाक्षरीमुळे अधिकृत उमेदवार होता आले नाही.

धाराशिव जिल्ह्यात महायुतीमध्ये उमेदवारी दाखल करण्यावरून मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. इतरांना मात्र, डावलण्यात आल्याने मोठा असंतोष उफाळला आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठी नाराजी उफळली आहे. २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यादिवशी काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT