MLA Rana Jagjitsinh Patil Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv News : धाराशिवचा दुष्काळ संपणार? ; सांगली-कोल्हापुरातील पुराचे पाणी वळवलं जाणार!

Shital Waghmare

Flood water of Sangli-Kolhapur : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे मोठ्याप्रमाणात घरे व शेतीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी येणारे अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेची मदत ही घेतली जाणार आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा हा कायम मागास किंवा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला आता कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पास जागतिक बँकेची मंजुरी -

याबाबत अधिक माहिती देताना राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले, 'महापुराचे पाणी वळवून धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण आग्रही होतो. याला पूरक प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जागतिक बँकेचे पथक 14 रोजी धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहे. हे पथक कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची पाटील यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'या प्रकल्पाला जोडून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात वळवणेसाठी 100 किमी बोगद्यातून पुराचे पाणी नीरा नदीत सोडण्यात येणार असून बॅरेजमधून पुढे ते उजनी धरणात सोडले जाणार आहे. तिथून पुढे ते घाटने बॅरेजच्या माध्यमातून रामदरा तलावात सोडून धाराशिव जिल्ह्यात आणायचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 15 हजार कोटींचा निधी लागणार आहे. जागतिक बँकेच्या माध्यमातून यासाठी कर्ज मिळण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे.' अशी माहितीही त्यांनी दिली.

1 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार -

तसेच 23.66 टीएमसीच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पाहिल्या टप्प्यात 7 टीएमसी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरीत 16.66 टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील 1 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. हा प्रकल्प अवर्षण प्रवण धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असणारा असून यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार असल्याचा दावाही राणा पाटील यांनी केला आहे.

जागतिक बँकेच्या पथकासमोर जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प कसा महत्वपूर्ण आहे. हा प्रकल्प झाल्याने इथल्या नागरिकांच्या अर्थकारणावर त्याचा कसा परिणाम होणार आहे याबाबत सादरीकरण करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या सहकार्याने जागतिक बँकेकडून यासाठी निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT