Congress News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांचे विश्वासू माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आल्यावर हवेत उडालेले काँग्रेसचे विमान विधानसभा निवडणुकीतील पराभवाने जमीनीवर आले. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. आता राज्याचे नेतृत्व राहुल गांधी यांनी नव्या दमाच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने कामाला लागलेल्या सपकाळ यांनी मरगळ आलेल्या जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांनीही आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निमित्त होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे महायुती शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर अनेक आश्वासने दिली गेली असली तरी त्यांची अंमलबजावणी न करता शासन केवळ वेळकाढूपणा करत आहे. याविरोधात (Congress) काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार 3 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय., सेवादल, इंटक, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओ.बी.सी. विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि इतर सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली
3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भव्य शेतकरी मोर्चा महात्मा गांधी स्मारक शहागंज येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन याच दिवशी सुरू होत असून, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी या निमित्ताने करण्यात येणार आहे. याशिवाय 8 व 9 मार्च रोजी मस्साजोग ते बीड दरम्यान,काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हजार कार्यकर्त्यांचे पथक रवाना होणार आहे.
या रॅलीचे नियोजनदेखील अंतिम टप्प्यात आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कल्याण काळे यांनी यावेळी केले. आजच्या आढवा बैठकीसाठी माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार,सेवादल प्रदेशअध्यक्ष विलास बापू औताडे,जिल्हाप्रभारी मुजहीद खान,किरण पाटील डोणगावकर आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.