पृथा वीर
Daulatabad Fort News : यादवांच्या काळातील अभेद्य वारसा आणि कधीकाळी देशाची राजधानी असलेल्या देवगिरी किल्ल्यावर लागलेल्या आगीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यांनी 11 एप्रिलला केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिले व किल्ल्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. एकीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात वागत आहेत.
दोन मंत्री, आठ आमदार जिल्ह्यात असूनही एकाही लोकप्रतिनिधीने केंद्रीय पुरातत्व विभागाला जाब विचारला नाही की, या किल्ल्याला भेट दिली नाही, याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Chhatrapati Sambhajinagar) 8 एप्रिलला देवगिरी किल्ल्याला भलीमोठी आग लागली. ती थेट किल्ल्याच्या बारादरीपर्यंत पोचली. यात किल्याचे अतोनात नुकसान झाले. इतके की, दोन दिवस उलटल्यावरही किल्ल्याच्या काही भागात लाकडे पेटलेली होती.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कारभारावर सडकून टीका केली. इतिहास तज्ज्ञांनीही या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत देवगिरी किल्ल्याभोवतीच्या अतिक्रमणावर आक्षेप घेतला. (Supriya Sule) या घटनेवर पर्यटन आणि पुरातत्व क्षेत्रात काम करणाऱ्यांनी वारंवार संतपा व्यक्त केला. पण जिल्ह्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींना याची दखल घ्यावीशी वाटली नाही.
मध्यंतरी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्दा आला तेव्हा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकमेकांवर तुटून पडले. मात्र देवगिरी किल्ला हा राजकीय मुद्दा नसावा म्हणूनही कदाचित लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेही नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी मात्र 11 एप्रिलला केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिले व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तात्काळ आग प्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
किल्ल्याला आग लागण्याच्या घटनेस चार दिवस उलटले. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी पत्र लिहिले. बारादरीसारख्या ऐतिहासिक वास्तूंना आगीची झळ बसली आहे. या आगीमुळे परिसरातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास संपला आहे. देवगिरी किल्ला राष्ट्रीय स्मारक असून महाराष्ट्र आणि देशाचा हा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा आहे. हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे आग प्रतिबंधक उपाययोजना करुन किल्ल्याचे जतन करावे.
किल्ल्यावर गवत आणि वनस्पती वेगाने वाढतात आणि वास्तूचे नुकसान करतात. आगीला कारण ठरणारे वाळलेले गवत, फांद्या आणि प्लास्टिक उन्हाळ्यात हटवावे. पर्यटकांची कडक तपासणी करुन सिगारेट आणि लायटर अशा ज्वलनशील वस्तू ताब्यात घ्याव्यात, आग विझविण्यासाठी पाण्याचा हौद आणि इतर यंत्रणा उभारावी, अशी मागणी या पत्रात सुळे यांनी केली आहे. देवगिरी किल्ल्यात केवळ चार सुरक्षारक्षक असून किमान 20 प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पुरातत्वीय निकषानुसार किल्ल्याचे जतन व संवर्धन करावे,असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.