KCR Sarkarnama
मराठवाडा

Nanded BRS News : तेलंगणातील पराभव, अन् KCR यांच्या आजारपणामुळे महाराष्ट्रात BRS ला ब्रेक

Laxmikant Mule

Nanded Politics News :

तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकल, असा ज्यांचा उल्लेख करावा ते तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या आजारी आहेत. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता गेली आणि काँग्रेसने इथे मोठा विजय मिळवत बहुमत मिळवले. एकीकडे राज्याची सत्ता गेली, तर दुसरीकडे केसीआर आपल्या फार्महाऊसमध्ये फिरत असताना पाय घसरून पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.

फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार करण्यात आले. नंतर ते महिनाभरापासून घरातच पडून आहेत. त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन महिने लागू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तेलंगणातील पराभव आणि केसीआर यांच्या या आजारपणामुळे बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्तारालाच ब्रेक लागला.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात एखादे वादळ घोंघावत यावे, अशा पद्धतीने बीआरएसची नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री झाली. तेलंगणा मॉडेल आणि गुलाबी वादळात महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेकांनी गुलाबी स्वप्नम रंगवली.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि केसीआर यांना झालेली दुखापत यात बीआरएसचा विस्तार आणि अनेकांचे गुलाबी स्वप्नही भंगले. मराठवाड्यातील बीआरएसचे समन्वयक संतोष माने यांनी केसीआर लवकरच बरे होतील आणि आम्ही नव्या जोमाने कामाला लागू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवाय पुढील आठवड्यात केसीआर स्वतः मराठवाडा आणि महाराष्ट्रातील नेते, पदाधिकाऱ्या्ंची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू असताना बीआरएसमध्ये मात्र यासंदर्भात चर्चाही होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

तेलंगणामध्ये जेव्हा बीआरएसची सत्ता आणि केसीआर यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. तोपर्यंत मराठवाडा आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या तेलंगणा, हैदराबाद आणि केसीआर यांच्या निवासस्थानाचे खेटे सुरू होते. तिकडचे नेतेही राज्यात येऊन वातावरणनिर्मिती करायचे. पण आता हे सगळंच थांबलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी बीआरएसची कार सुसाट वेगाने धावत होती. 'अब की बार किसान सरकार'चा नारा देत एक गुलाबी स्वप्न रंगविले गेले. पण एक पराभव आणि केसीआर यांच्या अपघाताने बीआरएसच्या राजकीय प्रवासात गतिरोधक व खड्ड्यांचे अडथळे निर्माण झाले आहेत.

सत्ता गेल्यावर पक्षात येणाऱ्यांचा ओघ थांबला आहे. उलट स्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते टिकवण्याचे मोठे आव्हानच चंद्रशेखर राव व त्यांच्या नेत्यांपुढे असणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी के. चंद्रशेखर राव हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. पण सध्या ही चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी खूप आधीपासून करावी लागते. पण बीआरएस पक्षात निवडणूक तयारीच्याबाबतीत सन्नाटा पसरला आहे. या पक्षात गेलेल्या महाराष्ट्रतील नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT