MLA Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Patil Nilangekar Rally: मराठवाड्यातून चार मुख्यमंत्री तरी पाण्यासाठी हाल; निलंगेकरांची जलसाक्षरता रॅली...

राम काळगे

Latur Political News : मराठवाड्यातून चार मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांच्या कार्यकाळात जनरेटा नसल्यामुळे मराठवाड्यातील शेती व पिण्यासाठी पश्चिम वाहिनीतून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी कायमस्वरूपी मिळू शकले नाही. (Latur Water Issue News) आता लातूर जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी जनरेट्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी मिळवणारच, असा संकल्प माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जल साक्षरता रॅलीच्या माध्यमातून केला.

ग्रामदैवत निळकंठेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेत निलंगेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जलसाक्षरता अभियानास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निलंगा येथून प्रारंभ झाला. (Sambhaji Patil Nilangekar) पहिल्याच दिवशी गावोगावच्या नागरिकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Water Supply) हजारो जलयोद्ध्यांसह त्या-त्या गावातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवला.

यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathwada) हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील नागरिकांना जलसाक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात येणाऱ्या या अभियानास आज दि. १९ मंगळवारी निलंगा येथून प्रारंभ झाला.

सकाळी वृंदावन मंगल कार्यालयात सर्वांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ग्रामदैवत निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी निळकंठेश्वराची महाआरती करण्यात आली. यानंतर माकणी थोर येथे नवसाला पावणाऱ्या हनुमानाचे दर्शन व महाआरती करण्यात आली. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा, नागरिकांना पिण्यासाठी व पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, असे साकडे निलंगेकर यांनी हनुमंताला घातले.

पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. यावर्षी आपल्या लातूर जिल्ह्यात अद्यापही पाऊस झालेला नाही, त्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. उर्वरित काळात पाऊस झाला नाही तर भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. दुष्काळातील उपाययोजना करण्यासाठी आपण शासनाकडे मागणी केलेली आहे. तरीही उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पावसाच्या माध्यमातून मिळणारे पाणी साठवून ठेवावे, यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आपण हे अभियान राबवत आहोत.

शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरसह धाराशिव व बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता शासनाने हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे, अशी आपली मागणी असल्याचे निलंगेकर म्हणाले. मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या काळात दुष्काळी स्थिती कायमची दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मानसिकता त्या-त्या नेत्यांनी दाखवली.

परंतु काही नेत्यांच्या दबावामुळे ते शक्य झाले नाही. नेत्यांच्या इच्छाशक्तीला जनरेट्याची जोड मिळाली असती, तर शासनाला त्याची दखल घ्यावी लागली असती. आताही शासनाने निर्णय घेतला आहे, त्याला जनरेट्याचे पाठबळ मिळावे म्हणूनच सरकारमध्ये असूनही आपण हे अभियान राबवित आहोत. शेती आणि उद्योगालाही पाणी मिळणे आवश्यक असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT