Nitin Gadkari Sarkarnama
मराठवाडा

Nitin Gadkari News : 'गडकरीसाहेब, सोलापूर-उमरगा रस्त्याच्या काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली कधी टाकणार?'

अय्यूब कादरी

Dharashiva News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे कामही धडाकेबाज आहे. गडकरी हे केंद्रातील एकमेव परफाॅर्मर मंत्री आहेत, असे भाजपचे नेतेही खासगीत मान्य करतात. वाशीममधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘रस्ता खराब झाला, तर मी काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली टाकेन,’ असा दम भरला. गडकरींना सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील सोलापूर ते उमरगा आणि पुढे कर्नाटक सीमेपर्यंतच्या रस्त्याचा काॅन्ट्रॅक्टर सापडत नाही का, असा प्रश्न आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे, त्यामुळे गडकरी या काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली कधी टाकतात, असा सवाल येथील नागरिक करत आहेत. (Gadkari Saheb, when will the contractor of Solapur-Umarga road be bulldozed?)

राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ६५) सोलापूर ते उमरगादरम्यान चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून यादरम्यानच्या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यानंतरही टोलवसुली सुरू झाली. मात्र, या रस्त्याचे आणि वाहनधारकांचे भाग्य मात्र अद्यापही उजळलेले नाही.

सोलापूर ते उमरगा आणि पुढे कर्नाटक सीमेपर्यंत जवळपास १०० किलोमीटरच्या टप्प्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असतात. बहुतांश ठिकाणी उड्डाणपुलांचे काम झालेले नाही. अनेक मोठ्या गावांसाठी सेवारस्ता (सर्व्हिस रोड), बोगदे (अंडरपास) तयार करण्यात आलेले नाहीत. अनेक गावांच्या लोकांनी यासाठी आंदोलने केली. मात्र, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दमदाटी करत ती आंदोलने मोडीत काढली. माजी, आजी खासदारांनी नितीन गडकरींकडे खेटे मारले. मात्र, उपयोग झाला नाही.

उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत जाऊन या रस्त्याची दुरवस्था दाखवणारे प्रेझेंटेशन गडकरी यांच्यासमोर केले. त्यानंतर काॅन्ट्रॅक्टर बदलण्यात आला, असे सांगितले गेले. मात्र, रस्त्याच्या कामात फारशी प्रगती किंवा सुधारणा दिसून आलेली नाही. गडकरींनी काॅन्ट्रॅक्टर बदलला, मात्र त्याला बुलडोझरखाली टाकले नाही. वाशीम येथेच नव्हे; तर यापूर्वीही गडकरींनी काॅन्ट्रॅक्टरना असा दम भरला आहे.

येथे जसा उपहासाचा भाग आहे, तसा गडकरींच्या धडाकेबाज वक्तव्यांमधील पोकळपणाचा आहे. काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली देईन, म्हणजे तसे होत नसते. त्या वक्तव्याचा तसा अर्थही घ्यायचा नसतो, पण इतकी धडाकेबाज वक्तव्ये करत असताना १०० किलोमीटर रस्त्याच्या परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून काय आणि कशा यातना सहन करत असतील, याची जाणीव गडकरींना नसेल काय? नसेल तर मग अशी धडाकेबाज वक्तव्ये म्हणजे केवळ स्टंट म्हणावा लागेल.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. उड्डाणपुलांचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. अनेक मोठ्या गावांतील सेवारस्त्यांची कामे रखडलेली आहेत. या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली आहे. पाणंद रस्त्यातून बैलगाड्या जाऊन जाऊन चाकोरी तयार होते आणि मध्यभागी उंचवटा निर्माण होतो. अगदी अशीच अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. त्यामुळे वाहने हेलकावे खातात.

माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गडकरी यांना निवेदने दिली. खासदार राजे निंबाळकर यांनी टोलवसुली बंद पाडण्याचा इशारा दिला. पण, रस्त्याची अवस्था तर तशीच आहे आणि टोलवसुली मात्र जोमात सुरू आहे. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी स्वखर्चाने या रस्त्याचे सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर या वर्षी १७ जानेवारी रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन सादर केले. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. त्यानंतर गडकरी यांनी काॅन्ट्रॅक्टर बदलला, असे चैागुले यांनी सांगितले. रस्त्याची अवस्था मात्र तशीच आहे.

हा रस्ता सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या अखत्यारित येतो. तेथील अधिकारी काही करत असतील का, अशी शंका निर्माण होते. या रस्त्याचा काॅन्ट्रॅक्टर कोण आहे, हे गडकरी यांना माहीत नसेल काय, असेल तर मग त्यांना बुलडोझर उपलब्ध होत नाही का, असा प्रश्न या भागातील त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT