शितल वाघमारे
Dharashiv News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच धाराशिवमध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
ज्यांचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकर्याने आत्महत्या केली, तेच आता शेतकर्यांचा कळवळा दाखवित आहेत. पोटाला चिमटा देवून कमवलेली मिळकत यांची कर्जे सारण्यासाठी बँकेत भरण्याची वेळ शेतकर्यांवर आली आणि आता हेच पुतणा-मावशीचे प्रेम दाखवित आहेत. औसा येथील सभेत कोणापुढे झुकलात? निवडून आल्यावर सभागृहात पहिल्या भाषणात कोणाचा उदो-उदो केलात? कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ? अशा शब्दांत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी खासदार ओम राजेनिंबाळकरांना सवाल विचारले आहेत.
ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात खासदार राजेनिंबाळकर (Om Rajenimblakar) यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी प्रतिष्ठाण भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काळे यांच्यासह रामदास कोळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीला पराभव दिसत असल्याने खासदार केवळ बडबड करीत आहेत. कोणाच्या आशीर्वादामुळे ते लोकसभेत पोहोचले? याबाबत त्यांनीच सभागृहात केलेले पहिले भाषण पुन्हा एकदा पहावे. आपल्या कारकिर्दीत एकही भरीव सांगण्याजोगे काम नसल्यामुळे ते गावगप्पा मारत आहेत. भावनिक मुद्द्यांवर संभ्रम निर्माण करण्यात त्यांची हातोटी असल्याची टीका काळे यांनी केली.
नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशात आणि राज्यात सुरू असलेल्या अभूतपूर्व विकासकामांची सर्वांना माहिती आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न महायुती सरकारने निकालात काढला. कृष्णा प्रकल्पातील पाणी जिल्ह्यात येण्याचा मार्ग याच सरकारमुळे सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीचे संघटन पाहून खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी इतिहासात सर्वाधिक निधी महायुती सरकारने दिला आहे. या सगळ्या बाबींमुळे खासदार राजेनिंबाळकर यांचा तोल ढळू लागला आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला पुरेसा असल्याचा दावाही नितीन काळे यांनी केला.