Chhatrapti Sambhaji Nagar News : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील (नीट) गैरप्रकाराची चौकशी करावी, जेथे प्रश्नपत्रिका केंद्रातून बाहेर पसरली तेथे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका येथील खंडपीठात सोमवारी (ता. 10) सादर करण्यात आली. या याचिकेवर येत्या 18 जून रोजी खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.
निकिता विजय फंदाडे व इतर तिघांनी अॅड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका केली आहे. नीटची (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) देशभरातील 571 शहरांमध्ये 4 हजार 750 केंद्रांवर 24 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
परदेशात 14 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. याचिकेनुसार, देशात 'नीट'च्या (Neet) परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळाले. त्यातही आठ विद्यार्थी एकाच हरियाणा राज्यातील केंद्रावरील आहेत.
गेल्यावर्षी केवळ एकाच विद्यार्थ्याला 720 गुण मिळाले होते. याशिवाय यंदा तब्बल 1563 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेत क्लॅट (कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट) पद्धतीचा वापर केला जो की चुकीचा आहे. गुणवत्ता यादीतील 68 आणि 69 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना 718 व 719 गुण मिळालेले आहेत.
एनटीएच्या (राष्ट्रीय परीक्षा एजन्सी) नियमानुसार 718 व 719 गुण मिळणे अशक्य आहे. कारण यात ऋण (निगेटिव्ह गुण) पद्धती आहे. जर एका प्रश्नाचे उत्तर चुकले तर पाच गुण कपात होतात. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच गुण कमी होणे अपेक्षित असताना त्यांना अनुक्रमे दोन आणि एक गुण कसा कमी झाला? तसेच ज्या केंद्रावर व्यवस्थेच्या कारणास्तव परीक्षा उशिरा सुरू झाल्या, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मिनिटागणिक अतिरिक्त गुण देण्यात आले.
यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवलेच नाहीत, त्याचेही त्यांना भरभरून गुण मिळाले आहेत. हा प्रकार अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. या परीक्षेतील गुण पद्धत 'नीट'च्या प्रचलित धोरणाविरुद्ध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी बिहार, राजस्थान व गुजरात येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असतानाच निकाल जाहीर करण्यात आला.
विशेष म्हणजे निकालाची नियोजित तारीख 14 जून असताना, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात आला असून, हे सर्व संशयास्पद असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधींकडूनही केली जात आहे. उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जालन्याचे काँग्रेस (Congress) आमदार कैलास गोरंट्याल यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.