Manoj Jarange Raosaheb Danve sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha 2024 Constituency : मराठा फॅक्टर, पक्षांतर्गत गटबाजीने रावसाहेब दानवेंचा घात...

Jagdish Pansare

Jalna Election Result 2024 News : सलग पाचवेळा लोकसभेच्या जालना मतदारसंघात लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवत दिमाखाने केंद्रात मंत्री म्हणून मिरवणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा यदांच्या निवडणुकीत मात्र घात झाला. महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. सलग सहावा

दोनवेळा आमदार, सलग पाचवेळा खासदार, केंद्रात दोनदा राज्यमंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मतदारसंघात सुप्त लाट होती. विशेषतः भाजपअंतर्गत ती मोठ्या प्रमाणात होती, त्याचा यावेळी स्फोट झाला.

सातत्याने निवडणुकीत यश, त्या माध्यमातून सत्ता, मंत्रीपद, कंत्राटदारीच्या माध्यमातून सुरू असलेली एकाधिकारशाही, स्वपक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच त्रास दिल्याचा आरोप या सगळ्याचा परिणाम मतांच्या रूपात दिसला.

प्रदीर्घ राजकीय अनुभव असूनही रावसाहेब दानवे यांना आपल्या विरोधात असलेली नाराजी लक्षात आली नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही सातत्याने केला जात होता.

विधानसभा, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही दानवे यांनी सग्यासोयऱ्यांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने झाला. या सगळ्याबद्दलचा रोष मतदारांनी ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्त केला आणि रावसाहेब दानवे यांचा घात झाला.

मराठा फॅक्टरचा फटका

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन याच जालना मतदारसंघातून राज्यभरात पोहचले होते. जरांगे पाटील यांनी जेव्हा राजकीय नेते, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करणारे पोस्टर लावण्याचे आदेश दिले होते. तेव्हा रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यातील एका गावात गावबंदीचे हे पोस्टर फाडण्यात आले होते. याचा ठपका दानवे यांच्यावर ठेवण्यात आला होता.

त्यानंतर जरांगे यांनी जाहीर सभांमधून दानवे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत तुम्हाला गुलाल कसा लागतो, ते मराठा पाहतील, अशा इशारा दिला होता. दानवे यांच्या या पराभवानंतर तो खरा ठरताना दिसतो आहे.

या शिवाय मराठा आरक्षणाच्या बाबतीत रावसाहेब दानवे यांनी ठोस भूमिका न घेता मौन बाळगले होते. त्याबद्दल मराठा समाजाच्या मनात राग होता, तो मताच्या माध्यमातून व्यक्त झाला.

अंतरवाली सराटीत सुरु असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या आठवणी निवडणूक काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून ताज्या करण्यात आल्या होत्या. याचा फटकाही रावसाहेब दानवे यांना बसल्याची चर्चा आहे.

मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली तेव्हा अनेकांनी त्यांना मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. परंतु जरांगे यांनी आपला कोणालाही पाठिंबा किंवा विरोध नाही.

मराठा समाजाच्या (Maratha Reservation) विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांना पाडा, असे म्हणत सूचक इशारा दिला होता. त्यानंतर साबळे यांना तब्बल दीड लाखापर्यंत मजल मारली. साबळे यांच्यामुळे दानवे विरोधकांना पर्याय मिळाला आणि त्यांनी काळे ऐवजी अपक्ष उमेदवाराला मतं देऊन राग व्यक्त केला.

त्यामुळे महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना काँग्रेसचे पारंपारिक मतं मिळाली, शिवाय शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाल्याने त्यांनी तब्बल पावणे सहा लाख मतांचा पल्ला गाठत रावसाहेब दानवेंच्या पराभावर शिक्कामोर्तब केले.

घरोघरी पत्र, अन् दानवेंना विरोध..

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विरोधात महाविकास आघाडीने रान पेटवलेले असताना यात भाजपमधील अंतर्गत विरोधकांनी त्यात भर टाकण्याचे काम केले. चाळीस वर्षापासून भोकरदन तालुका आणि जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे व कुटुंबाची एकहाती सत्ता होती. त्यातून आपल्या पक्षातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दानवे यांनी त्रास दिला.

तसेच दबावाचे राजकारण करत विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, अनेकांवर खोट्या केसेस, पोलिसांच्या जाळ्यात अडकवत खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप निनावी पत्राच्या माध्यमातून करण्यात आले होते.

ही पत्र पोस्टाने घरोघरी पाठवण्यात आली होती. याचा मोठा फटका दानवे यांना बसला, भाजपचे अनेक पदाधिकारी हे महाविकास आघाडीचे कल्याण काळे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्कात होते. या सगळ्याचा परिणाम काळे यांच्या विजयात आणि दानवेंच्या पराभवात झाला.

सत्तार-खोतकरांनी हात दिला..

रावसाहेब दानवे यांना महायुतीतील घटक पक्षाने चांगलाच हात दिल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी असलेली सेटिंग यावेळी बिघडली. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव या कायम लोकसभेला मताधिक्य मिळवून देणाऱ्या मतदारसंघात दानवे पिछाडीवर गेले.

अर्जून खोतकर यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत विधानसभेला पुर्ण मदत करण्याचा शब्द दानवेंनी फिरवला. जालन्यात त्यांनी शिवसेना-भाजप युती असून खोतकरांऐवजी काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना मदत केल्याचा आरोप झाला. खोतकर यांचे राजकारण संपवण्यासाठी त्यांच्या मागे रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री प्रकरणात ईडी लावल्याचा आरोप खुद्द खोतकर यांनी केला होता.

यावेळी महायुती असल्याने आपण रावसाहेब दानवेंचे काम करणार असे सांगणारे खोतकर यांनी विधानसभेत दिलेल्या धोक्याची परतफेड शांतपणे केली. एकूण रावसाहेब दानवे यावेळी चक्रव्युहात अडकले दिसले. हे चक्रव्यूह दानवे यांना शेवटपर्यंत भेदता आले नाही.

जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते केंद्रात मोठे नेते होणार आहेत, असे संकेत दिले होते. पण मतदारांनी दानवे यांना ती संधी मिळू दिली नाही. लोकसभेतील पराभवानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात? त्यांचे पुनर्वसन कसे करतात? हे पहावे लागेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT