Abdul Sattar- Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : 'दोस्त दोस्त ना रहा...' अब्दुल सत्तारांनी दानवेंना चकवा दिल्याची चर्चा !

Jagdish Pansare

Jalna News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेच्या जालना मतदारसंघातील सलग पाच विजयात सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार यांची साथ मोलाची ठरली होती. लोकसभेच्या बदल्यात विधानसभेला मदत हे गणित गेल्या वीस वर्षापासून दानवे-सत्तार यांच्यात ठरलेले होते. सत्ताराची सासुरवाडी दानवेंच्या भोकरदन, तर दानवेंची सासुरवाडी सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात. यामुळे या दोघांची गट्टी चांगली जमली होती. दोघांचेही राजकारण गुण्यागोविंदाने सुरू असतांना या लोकसभा निवडणुकीत मात्र त्याला कोणाची तरी नजर लागल्याची चर्चा आहे. राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहिर असलेल्या रावसाहेब दानवे यांना यावेळी मात्र सत्तारांकडूनच चकवा मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.

रावसाहेब दानवे यांच्या विजयात आणि मताधिक्यात सत्तारांच्या सिल्लोड सोयगावचा मोठा वाटा राहिला आहे. यावेळी मात्र नाराज सत्तारांनी मैत्री धर्म न निभावता वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील मुस्लिम वोट बॅंक सत्तारांच्या शब्दा बाहेर नाही हे वगळे सांगायला नको. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या मुस्लिम मतदारांनी सत्तारांच्याच सांगण्यावरून नोटाचा पर्याय स्वीकारत रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचे दिसून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मात्र सत्तार यांनी कुठलाच पर्याय शिल्लक न ठेवता काँग्रेसमधील त्यांचे जुने मित्र कल्याण काळे यांना मदतीचा हात दिल्याचे समजते. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येत विजयाचा षटकार ठोकू पाहणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा झेल सीमारेषेतच टिपला जाऊ शकतो, अशी चर्चा मतदारसंघात उघडपणे सुरू आहे. मराठा (Maratha) आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेला रोष अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान होऊ व्यक्त होईल, असा अंदाज होता. पण तोही फोल ठरल्याची चर्चा आहे.

पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड या तीन तालुक्यातील काही भागातूनच साबळे यांना मते मिळाल्याचे समजते. ही मते काही हजारात असल्याने त्याचाही फारसा उपयोग दानवे यांना होणार नाही, असे दिसते. या उलट महाविकास (MahaVikas) आघाडीच्या कल्याण काळे यांना जालना लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे अडचणीत असल्याचा सूर लावला जात आहे.

पण गेल्या पंचवीस वर्षात दानवे यांनी जालना शहर व जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. रस्त्यांचे जाळे, पाणी योजनांसाठीचा निधी, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण-दुहेरीकरणाची कामे, ड्रायपोर्ट, आयसीटी कॉलेज, जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन ही विकास कामेच आपल्याला पुन्हा विजय मिळवून देतील, असा विश्वास अजूनही दानवे यांना आहे. सत्तारांनी दिलेला हात, मराठा आरक्षणाचा मुद्दा अन् काळे यांनी घेतलेली मुसंडी अशा वातावरणात दानवेंनी बाजी मारली, तर मात्र ते बाजीगर ठरतील एवढे मात्र निश्चित.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT